Saturday, January 14, 2017

तिरंगी ध्वजाचे तिकीट

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला . त्यावेळेस पोस्ट तिकिटे म्हणून ब्रिटिश तिकिटे वापरत होती . कारण
तेव्हा स्वतंत्र भारताची अशी नविन तिकीटांची छपाई झालेली नव्हती . मग त्यावेळी काही काळ ' जयहिंद '
असा पोस्टाचा शिक्क़ा दिल्ली येथे वापरला जात होता . 15 डिसेंबर 1947 रोजी  अशोक स्तंभाचे तीन सिंहाचे तिकीट आणि भारतीय तिरंगा ध्वजाचे अशी दोन तिकिटे छापन्यात आली . त्यावर 15 ऑगस्ट 1947
आणि ' जयहिंद' असे छापन्यात आले आहे . तसेच 15 ऑगस्ट 1947 ला जे भारतीय तिरंगा झेंडा असलेले तिकीट काढण्यात आले ते परदेशीय टपालासाठी वापरण्यात येत असे . जेणे करुन जगाला भारतीय तिरंगा ध्वजाची ओळख व्हावी.

सुनिता भाईदास पवार
जि प केंद्रशाळा निमगव्हाण
ता चोपडा जि जळगाव

विषपरीक्षा घेणारी भांडी

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील विसावा लेख : विषपरीक्षा घेणारी भांडी

मानवी संस्कृतीत ‘भांडी संस्कृती’ हा एक अभ्यासाचा विषय आहे.इसवीसनपूर्व १२०० मधील ताम्रपाषाण युगांपासून झालेले विविध कालखंडातील , विविध प्रदेशातील, विविध प्रकारातील व विविध गरजांनुसार बनविलेली भांडी त्या त्या काळाचे निदर्शक असल्याचे पुरातत्वज्ञ मानतात. मातीची भांडी आजही आपणांस कधी न कधी वापरावी लागतात, पण तांबे, पितळ,लाकूड, दगड, कातड्याची अशी कितीतरी प्रकारची भांडी विविध आकारात वापरली जात.सोने-चांदी गेले, पितळ आले, पितळ गेले आणि जर्मन व स्टेनलेस स्टील आले आणि आता तर प्लास्टिकचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले आपण पाहत आहोत.

आपापल्या गरजेनुसार या भांड्यांचा उपयोग होईल. राजेमहाराजे, त्यांचे सरदार, अमीर-उमराव यांचे जनानखाने मोठे, त्यांचा कुटुंब कबिला मोठा, साहजिकच भाऊबंदकी , हेवेदावे यामुळे एकमेकांचा काटा काढण्याचे प्रयत्न केले जात. शिवाय दरबारातील सुंदोपसुंदी, शत्रूकडून फंदफितुरी यांनी इतिहासाची पाने रंगली आहेत, तेव्हा स्वसंरक्षणासाठी सर्व बाबतीत काळजी घेणे अत्यावश्यकच ठरले. राजघराण्यात विषप्रयोग कोणाकडूनही, केव्हाही होण्याचा संभव असतो, तेव्हा आपल्या जेवणाच्या पदार्थात  मग ती न्याहारी असो वा शाही मेजवानी असो. त्यातील खाद्यपदार्थांची परीक्षा घेण्याची फार प्राचीन पद्धत आहे. मोगल दरबारात असे प्रकार अधिक होण्याचा संभव होता. त्यासाठी विशेष प्रकारच्या दगडाची भांडी मुद्दाम तयार करण्यात येत असत. अरबस्तानातील एका विशिष्ठ दगडाची हि भांडी बनविली जात, असे म्हणतात. जहांगीर, अकबर, शाहजहान यांच्या काळातील अशाप्रकारची  भांडी दिल्ली , आग्रा, हैद्राबाद व परदेशातील काही ठिकाणी पाहिल्याची नोंद मिळते.

असे म्हणतात की कोणताही विषमिश्रित पदार्थ शिजविलेला व कच्चा या भांड्यात टाकला व काही वेळ ठेवला , तर या भांड्याचा रंग गर्द हिरवा होतो व विषविरहित असल्यास त्याचा रंग बदलत नाही. हि दगडी भांडी पातळ, सुबक, चकचकित, प्रमाणबद्ध असून रंग हिरवा व पिवळा(पोपटी) असतो.

मालोजीराजे भोसल्यांचे धाकटे बंधू विठोजी यांची आठ मुले भीमथडीला आपल्या जहांगिऱ्या आजही उपभोगतात्त. पैकी भिकाजीराजे भोसले हे एक. ते मोठे संशोधक होते. त्यांनी आपल्याकडील शहाजीराजांपासूनची सर्व कागदपत्रे, वस्तू व हत्यारे संस्थेस दिली. त्यात हस्तिदंताच्या पट्टीवरील जयसिंह राठोदांच्या दरबारात संभाजीचे रंगीत चित्र व विषपरिक्षा घेणारी भांडी हि वैशिष्ट्यपूर्ण नव्हे, तर महत्वाची व दुर्मिळ मानली जातात. या घराण्यातील परसोजी व सयाजी हे जयसिंहाच्या बाजूने शिवरायांच्या विरुद्ध पुरंदर तहापूर्वी झुंजत होते. त्या कामगिरीबद्द्ल औरंगजेबाने त्यांना इनाम दिले होते. त्यांच्या सनदाही उपलब्ध आहेत. सायजीराजे मोगल दरबारातील बडी असामी बनली व साहजिकच मोगली रीतिरिवाजाबरोबर या व अशाप्रकारच्या वस्तू त्यांच्याकडे आल्या असाव्यात आणि केवळ भिकाजीराजे भोसले यांच्या जागरुकतेमुळे हि भांडी संस्थेस उपलब्ध झाली. काही वर्षांपूर्वी त्यावेळचे गव्हर्नर अली यावर जंग यांनी जेव्हा संस्थेस भेट दिली, तेव्हा ही भांडी पाहून त्यांना हैद्राबाद येथील सालारजंग वस्तुसंग्रहालयातील भांड्यांची आठवण झाली. तेव्हा त्यांनी सुचविले होते की , या भांड्यात विशाबद्दल अशी प्रतिक्रिया का निर्माण होते? त्यात ते कोणते घटक आहेत? त्याचा शास्त्रीय , आधुनिक तंत्र वापरून शोध घेण्याची गरज आहे . पण नेमका तो कुठे घ्यावा, यासंबंधी अजून माहिती नाही. तरीही भांडी पाहताना राजदरबारातील हेवेदावे व त्यावरचा उपाय म्हणून वापरलेली हि भांडी आपले कुतुहल जागे करतात, हे खरे आहे.


लेखक - सुरेश जोशी ( अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय)
संकलन - प्रा. र. भ. वनारसेवरील लेख, सौ. प्रियांका प्रशांत कुंटे. यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.




पुण्याचा इतिहास दिन

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील एकोणीसावा लेख : पुण्याचा इतिहास दिन

शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्थापनेच्या कार्यातला सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे शायिस्तेखानाला पुणे सोडायला लावणे, हा होय. चैत्र शुद्ध अष्टमी ५ एप्रिल १६६३ रोजी, उत्तर रात्री शिवाजी महाराजांनी पुण्यातील लालमहालात मुक्काम ठोकून बसलेल्या शायिस्तेखानावर हल्ला केला, त्याच्या मुलाला ठार मारले आणि शायिस्तेखानाची बोटे छाटली. अशा प्रकारे पुण्यातला मुक्काम हलवून औरंगाबादला जाण्यास त्याला भाग पाडले. पुढे तर औरंगजेबाने शायिस्तेखानाची बदली त्यावेळी कुप्रसिद्ध असलेल्या बंगालच्या सुभेदारीवर केली. या पराक्रमाने महाराजांनी स्वराज्यावरचे प्राणांतिक संकट तर दूर केलेच; परंतू पुण्याचे पुणेपण राखले.
शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानावर केलेल्या या पराक्रमामुळे खास पुण्याचा म्हणून जर काही 'इतिहास दिन' साजरा करावयाचा असेल, तर तो हा ऐतिहासिक महत्वाचा 'चैत्र शुद्ध अष्टमी' हाच दिवस होय.

शायिस्तेखान : एक मोठा माणूस

शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाचे मर्म समजण्यास शायिस्तेखानाचा पराक्रम केवढा मोठा होता हे समजणे जरुर आहे. रामाचा पराक्रम समजण्यास रावणाचा पराक्रम वर्णन केला व अशा रावणास रामाने जिंकले एवढे एक वाक्य लिहिले म्हणजे पुरे होते, असा अलंकार शास्त्रात नियम आहे, तीच गोष्ट याबाबतीत आहे. शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाची बोटे तोडून त्याची फजिती केली, म्हणून शायिस्तेखान आज थट्टेचा विषय झाला आहे; पण कुणीही उठावे व शायिस्तेखानाला हसावे, इतक्या कमी योग्यतेचा माणूस शायिस्तेखान नव्हे.
महाराजांनीही, 'आम्ही शायिस्तेखानाची शास्त केली. पातशहाने नांव ठेविले, पण ते यथार्थ ठेविले नाही, आम्ही शास्त करुन ते रुजू केले' असा शायिस्तेखानावर विनोद केला; पण हा विनोद शिवाजी महाराजांनी केला आहे व तो शायिस्तेखानावर केला आहे, हे विसरणे योग्य नाही. शायिस्तेखान हा फार मोठ्या योग्यतेचा पुरुष होता. तो औरंगजेबाचा मामा. शहाजहान व त्याच्या दारा, शुजा व मुराद या मुलांचा पाडाव करुन त्याने औरंगजेबाला तख्त मिळवून दिले. त्या प्रसंगी त्याने जी कारस्थानपटूता दाखवली त्याबद्दल 'शायिस्तेखानाइतका मुत्सद्दी पुरुष साऱ्या हिदुस्थानात कुणी नव्हता,' अशी बर्नियरने त्याची यथार्थ प्रशंसा केली आहे. तो जितका मुत्सद्दी होता तितकाच पराक्रमीही होता. गोवळकोंड्याच्या स्वारीत व माळव्यात त्याने पराक्रम केला व २८ जानेवारी १६६०  ते ५ एप्रिल १६६३ या तीन वर्षांत शिवाजी महाराजांसारख्या हरहुन्नरी माणसाला सुद्धा जेरीस आणले. त्याने 'शिवाजीशी तह करावा' असा शहाणपणाचा सल्ला औरंगजेबाला दिला; परंतू औरंगजेबासारख्या महाहट्टी सत्ताधिशापुढे शायिस्तेखानासारख्या शहाण्या सल्लागाराचा सल्ला गार पडला. फिरंगोजी नरसाळ्याला त्याने सन्मानाने व औदार्याने शिवाजी महाराजांकडे परत पाठविले. तो उत्कृष्ट प्रशासक होता. तो पुण्यात असतांना एका रुपयाला दोन मण गहू मिळत असंत. तो बंगालचा सुभेदार असतांना, बंगाल खरोखरच 'सुफलां सुजलाम सस्यश्यामलाम' झालेला होता व रुपयाला आठ मण तांदूळ मिळत असत. तो धर्मात्मा होता व त्याने आपले ९६ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाखो रुपयांचा दानधर्म करुन सार्थकी लावले. अशा शूर, शहाण्या अष्टपैलू शत्रूचा पराभव  केला म्हणून शिवाजी महाराज मोठे.

लेखक - प्रा. श. श्री. पुराणिक
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. अमोल शिंपी यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.

पेशव्यांची घड्याळे !

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील अठरावा लेख : पेशव्यांची घड्याळे !

भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर अनेक आधुनिक वस्तू-उपकरणांचा आपणांस परिचय झाला. इंग्रजांनी भेट म्हणून दिलेल्या कात्री, चाकू, होकायंत्र, दुर्बीण अशा साध्या वस्तूंचेही इथल्या राजे सरदारांना मोठे अप्रूप वाटे. त्या वेळी घड्याळ हा अतिशय अमूल्य नजराणा मानला जाई. इंग्रज वकिलाने जहाँगीर बादशहाला घड्याळाचा नजराणा दिला होता. पेशव्यांनाही प्रारंभी इंग्रजांनी घड्याळे भेट म्हणून दिली होती. या घड्याळांची पेशव्यांना मोठी आवड होती. पहिला बाजीराव पेशवा घड्याळ वापरत असल्याच्या नोंदी आहेत. थोरले माधवराव व नारायणराव हे दोन्ही तर घड्याळांचे मोठे शौकीन होते. त्यावेळी घड्याळे प्रचंड महाग होती.  नारायणरावांचे घड्याळ तर अतिशय दुर्मिळ व महागडे होते. या मनगटी घड्याळांची ते फारच काळजी घेत व अगदी महत्त्वाच्या प्रसंगीच ते वापरत. त्याला ठेवायला अतिशय सुंदर मखमलीची डबी होती. एखाद्या गजऱ्याप्रमाणे ते हाताला घड्याळ बांधत व त्याला चमेलीचे अत्तर लावीत! पेशव्यांकडे एक घड्याळ तर एक हजार ६९१ रुपयांचे होते (त्यावेळी कारकुनांचा पगार ५-६ रुपये होता!) थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाला भेट म्हणून दिलेले घड्याळ तर फारच वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यातून संगीताचे विविध राग अतिशय सुमधूर आवाजात ऐकू येत. त्याची किंमत होती पाच हजार रुपये.


लेखक - हेमराज बागुल
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. अमोल शिंपी यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


सेफ्टी पीनचा शोध

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील सतरावा लेख :

सेफ्टी पिन हि क्षुल्लक वाटत असली तरी अत्यावश्यक आहे. १० एप्रिल १८४९ ला न्यूयॉर्क मध्ये वॉल्टर हंट नावाचा गृहस्थ आपल्या हातातील तारेचा तुकडा वेडावाकडा करीत आपल्या मित्राकडून उसने घेतलेले १५ डॉलर परत कसे करायचे , याच्या विवंचनेत होता आणि याच वेळी त्याला सेफ्टी पिन बनविण्याची कल्पना सुचली. त्याने पेटंट घेतले, पण ४०० डॉलरला विकून मित्राचे पैसे परत केले. हंटने १८३४ मध्ये शिवणयंत्राचा शोध लावला होता, पण बेरोजगारी वाढू नये म्हणून पेटंट घेतले नाही.

अर्थात पुरातनकाळीही लोक पिना वापरत होते, पण त्या प्राण्यांच्या बारीक हाडांपासून बनविलेल्या असायच्या. ग्रीक लोक आपल्या अंगरख्यांना प्राण्यांचे आकार असलेल्या सेफ्टी पिना लावायचे. नवरा बायकोला खर्चासाठी रोज थोडे पैसे द्यायचा, त्याला ‘पिन मनी’ असे म्हटले जायचे. अकराव्या शतकात इंग्लंडमध्ये सेफ्टी पिनांचे एवढे दुर्भिक्ष होते, कि दर वर्षी फक्त १ आणि २ जानेवारीला पिना विकल्या जायच्या. १९ व्या शतकापासून मात्र पिनांचे यांत्रिक पद्धतीने उत्पादन सुरू झाले.  त्या इतक्या स्वस्त झाल्या , कि कुणालाही परवडाव्यात.


लेखक - ईशान कवडीकर
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, सौ. प्रियांका प्रशांत कुंटे ांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


घोरपडे घाट आणि इतिहास

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील सोळावा लेख :

घोरपडे घाटाविषयीचे ल.ग.दिनकर यांचे पत्र वाचले. पत्राचा आशय चांगला आहे. घोरपडे घाटाच्या जीर्णोदारावाषयी गेल्याच वर्षी विजय काळे, विवेक शिंदे, नागपाल, सुरेश शिंदे, संजय गोडबोले, पाथ. ना. बलकवडे, मौरारराव चव्हाण, सौ. भार्गवी चव्हाण व माजी महापौर वंदना चव्हाण अशा सर्वांनी घोरपडे घाटावर सभा घेतली. पुणे महापालिकेचे स्थापत्य व आरोग्य विभागाचे अधिकारी त्या वेळी उपस्थित होते. महापालिकेने माझ्या विनंतीवरून व वंदना चव्हाण यांच्या आग्रहावरून घोरपडे घाटावर सफाई कामासाठी कामगारही नेमले होते. पुणे तहसील कार्यालयतील मिळकतीच्या उता-यात सिटी सर्व्हे क्रमांकासहित एक नकाशात ऐतिहासिक घोरपडे घाटावरील स्मारक छत्र्यासहित छापला आहे. घोरपडे घराण्यातील विश्वासराव संताजीराव घोरपडे, आनंदराव संताजीराव घोरपडे व सौ. गायकवाड अशी ( इ.स. १८२० च्या ) सरदार यशवंत राव यांच्या वंशजांनची नावे आहेत. आजमितीस कै. आनंदराव घोरपडे यांच्या कन्या सौ. भार्गवी चव्हाण    ( पूर्वाश्रमीच्या कु. राजनंदा आनंदराव घोरपडे)   या माजी महापौर वंदना चव्हाण यांच्या जाऊबाई असून, त्यांचे यशवंतराव घोरपडे यांचे सध्याचे वंशज पुढील प्रमाणे आहेत. श्री. कर्णसिंह दौलतराव घोरपडे ( कै. विश्वासरावांचे नातू), दत्तवाड हाऊस , कोल्हापूर ; कु. रत्नमाला घोरपडे , पुणे; श्री. प्रतापसिंह घोरपडे, कोल्हापूर;  सौ.वैजयंती माला दौलतराव घोरपडे;आनंदराव कर्णसिंह यांची बहिण संगीता गायकवाड.                    

म्हळोजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कार्यरत होते. त्यांना पन्हाळगडावर संभाजी महाराजांनसमवेत वास्तव्याठी व सुरक्षेसाठी शिवाजीराजांनी आदेश देऊन ठेवले होते. म्ळोजी घोरपडे यांना संभाजी महाराजांच्या आधीच औरंगजेबाकडून मारण्यात आले. त्यांची नावे तीन होती. ज्येष्ठ पौत्र इतिहास प्रसिद्ध संताजी घोरपडे, द्वितीत पुत्र बहिर्जी घोरपडे व तृतीय पुत्र मालोजी घोरपडे. हे तिन्ही व शिवाय विठोजी चव्हाण यांनी संयाजीच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या छावणीत घुसंन बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस काढून आणंन छत्रपती राजारामांनकडे सादर केला होता. संभाजीच्या हत्येनंतरची ही एक विशेष घटना होती. छत्रपती राजाराम महाराजांनी संताजीस कापशी व इतर ठिकाणची जहागिरी दिली. बर्हिजी यास 'हिंदुराव' हा किताब देऊन सोंडुखगुत्ती अशी ठिकाणे सरंजामाने दिली. मालोजी याअंस 'अमीर उल उमराव' किताब देऊन करवीर प्रांतातील दत्तवाडची सनद दिली. मालोजी घोरपडे यांच्यानंतर त्यांच्या घराण्यास दत्तवाडकर घोरपडे 'र उल उमराव'  असे ऐतिहासिक नावाने संबोधले जाते. वाठोजी चव्हाणांना 'हिंमत     बहाद्दूर'  हा किताब छत्रपती राजारामांनी दिला. त्यांच्या वंशजापैकी अॅड . हेमंत चव्हाण, मुरारराव चव्हाण , पुणे येथे आहेत. घोरपडे घाटाच्या आजमितीच्या मिळकतीच्या कागदपत्रावर वर नमूद केल्याप्रमाणे विश्वासराव संताजीराव घोरपडे व आनंदराव संताजीराव घोरपडे याअंची नावे आहेत. सौ भार्गवी चव्हाण व कर्णसिंह घोरपडे यांस कागदपत्र जाहीर करण्यासाठी, वारसाहक्काची नोंद करण्यासाठी त्यांच्या अर्जावून तहसील कार्यालयाने बोलावले आहे. घोरपडे घाटाच्या सुधारणेसाठी आम्ही एका जीर्णोद्धार समितीची स्थापना केली आहे.  घोरपडे घाट व परिसराची जमीन एकूण आठ एकर एकवीस गुंठे आहे. ऐतिहासिक कागदपत्रांत 'कळकीचा बाग' म्हणून ती नोंदविलेली आहे. ब्रिटिशानी १८२० मध्ये यशवंतराव घोरपडेंच्या निधनानंतर तांच्या पुत्राच्या नावे करून दिली होती. सावत्र भावंडे निपुत्रिक असल्याने औरस पुत्रास कळकीच्या बागेतील यशवंतराव घोरपडे, त्यांच्या पत्नी व इतर अशा तीन स्मारक छत्र्या असल्याबद्दल पूर्वीचा उल्लेख आहे. अहल्याबाईंनी बांधलेल्या घाटाशी संबंधीत असलेल्या कारागिरांच्या परंपरेतिल कामगार एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वाधात पूण्यात पाचारण केले असावेत. परंतू अहल्याबाईंनी बांधलेला हा घाट नव्हे . या घाटाचे स्वरूप निश्चितच वाखाण्यासारखे आहे. या घाटास लेगून नदीच्या प्रवाहात छोट्या बोटी वापरून नौका विहार करण्याचा महापालिकेचा बेत होता. तो रद्द झाला.              


लेखक - प्र. ज. तावडे
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, सौ. विदुला सौरभ थोरातयांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.



Wednesday, January 11, 2017

कसब्यात दोन हजार वर्षांपूर्वीच्या पुण्येश्वर मंदिराचे अवशेष

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील पंधरावा लेख :

पुण्यात कसबा पेठेतील घर क्रमांक १३०३ येथे राष्ट्रकूटकालीन पुण्येश्वर मंदिराचे अवशेष शुक्रवारी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या शिळेवरील कोरीव नक्षीत काढलेले वेली स्तर, गंधर्व स्तर व स्तंभ स्तर स्पष्ट दिसत आहेत.

पुणे , ता. २ : शहराला पुणे हे नाव देणाऱ्या आणि आता अस्तित्वात नसलेल्या पुण्येश्वर मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे  यांनी आज केला.कसबा पेठेतील घर क्रमांक १३०३ येथे हे अवशेष सापडले आहेत.

सुमारे २००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पुण्येश्वर मंदिराचे अवशेष असू शकतील अशा दोन शिळा सापडल्या. मात्र त्यातील विविध मूर्ती आणि लेख असणाऱ्या दोन शिळांपैकी लेख असणारी शिळा आजच बेपत्ता झाली, असे श्री बलकवडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘ पवळे चौकातील घर क्रमांक १३०३ येथे सध्या बांधकाम चालू आहे. आज सकाळी या ठिकाणी दोन शिळा सपडल्या. एका शिळेवर मूर्ती कोरल्या आहेत, दुसऱ्या शिळेवर काही लेख कोरले आहेत, असे स्थानिक लोकांनी सांगितले. लेख असणारी शिळा इतर दगडांबरोबरच तिथे कामावर असणाऱ्या ट्रकने उचलून नेली. मूर्ती कोरलेली शिळा अडीच फूट लांब, रुंद आणि उंच आहे. हि शिळा राष्ट्रकूट राजांच्या काळातील पुण्येश्वर मंदिराच्या द्वारशाखेचा भाग असावी. या शिळेवर तीन स्तर असून , वेली स्तरावर नाजूक आणि कोरीव नक्षी आहे. गंधर्व स्तरावर सोळा वादक  विविध वाद्य वाजवत असल्याच्या मूर्ती कोरल्या आहेत. स्तंभ स्तरावर सप्तनाग छत्र असलेली नंदी देवता , नारसिंह मूर्तीबरोबरच ध्यानमुद्रेतील संन्यासी आदी देवतांच्या सात मूर्ती आहेत. नामदेवांनी आळंदीच्या पंचक्रोशीचे वर्णन  करताना “दक्षिणे पुण्येश्वर देवो” असा उल्लेख केला आहे. सुलतानी काळात या ठिकाणी हिस्सार किल्ला बांधण्यात आला होता. सध्याच्या पवळे चौकात या किल्ल्याचा पूर्व दरवाजा होता. गावाचा सर्वात जुने भाग असलेल्या या ठिकाणी नव्या बांधकामासाठी पाया खोदताना जुन्या वास्तूचे अवशेष सापडत आहेत. सातवाहनकालीन खापरांचे तुकडे, शंखापासून बनविलेल्या बांगड्या , भाजलेल्या मातीचे खेळण्यांचे तुकडे आतापर्यंत सापडले आहेत.

“या परिसरात खोदकाम करताना अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. लेख असलेली शिळा इथून नेली नसती , तर आज आपल्याला खूप मोठी माहिती मिळू शकली असती.अशा प्रकारच्या कोणत्याही शिळा सापडल्यास त्या फेकून न देता इतिहास संशोधक मंडळाला अथवा मला दूरध्वनी क्रमांक २४४९९८९८ येथे संपर्क साधावा” असे आवाहनही त्यांनी केले.

लेखक - 
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, सौ विदुला थोरात यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


पुण्याचा इतिहास काही हजार वर्षे मागे जाण्याची शक्यता


मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील चौदावा लेख :

पुणे,ता.७:"पुण्याचा इतिहास इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकापासून सुरू होतो ,असे पुरावे नुकतेच सापडले होते.आता थेऊरजवळ ताम्रपाषाणयुगिन वस्तूंचे अवशेष मिळाले आहेत.याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केल्यास पुण्यातही ताम्रपाषाणयुगाचे  अवशेष मिळू शकतील.असे झाले तर पुण्याचा इतिहास आणखी काही हजार वर्षे मागे जावू शकेल "असे मत येथे झालेल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

श्री देवदेवेश्वर संस्थान तर्फे भरविण्यात आलेल्या "प्राचीन पुणे:एक आंतरशाखिय संशोधन "या विषयावरील परिसंवादात डेक्कन महाविद्यालयाचे माजी सहसंचालक प्रा.शरद राजगुरु ,डॉ.वसंत शिंदे ,डॉ.प्रमोद जोगळेकर ,डॉ.म.के.ढवळीकर, पांडुरंग बलकवडे,डॉ.वि.वि.पेशवा,पर्वती संस्थानचे प्रमुख विश्वस्त राम चव्हाण ,बापूसाहेब जोशी आदि सहभागी झाले होते.

पुण्याचा इतिहास पाषाणयुगानंतर म्हणजे केवळ सातव्या आठव्या शतकापासून सुरू होतो असा समज होता असे नमूद करून डॉ.शिंदे म्हणाले,"कसबा पेठेत नुकत्याच  झालेल्या संशोधनाने हा दावा फोल ठरवला.येथे सापडलेली खापरे ,बांगड्याच्या अवशेषांवरील नक्षी सातवाहन काळातील म्हणजे इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील आहे .यामुळे पुण्याचा इतिहास एक हजार वर्षे मागे गेला आहे .

डॉ.राजगुरु म्हणाले ,"मुळा-मुठा नदीच्या खोऱ्यात थेऊरजवळ साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या शेतीप्रधान संस्कृतीचे पुरावे सापडतात.त्यानंतर दुष्काळामुळे हि संस्कृति धोक्यात आली.पुढे मान्सूनचा पाऊस सुधारल्यावर मुठेला येणाऱ्या पुरामध्ये वाढ झाली आणि सातवाहन काळात मुळा-मुठेच्या खोऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या पठारी आणि किनारी भागातदेखील वसाहत वाढली; मात्र काही विशिष्ट कालावधीनंतर दुष्काळामुळे येथील वसाहत धोक्यात आल्याचे आढळते.त्यामुळे पुण्याच्या प्राचीन पर्यावरणाचा अभ्यास करताना प्रामुख्याने दुष्काळाचा विचार करावा लागतो.सध्या कमी झालेल्या पावसाच्या प्रमाणाचाहि याच दृश्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे

जैवतंत्रज्ञान आणि पुरातत्वशास्त्र एकत्र आल्याने जीवाश्मांच्या संशोधनाला आणखी चालना मिळाली आहे ,असे नमूद करून डॉ.जोगळेकर म्हणाले ,"प्राण्यांच्या अवशेषांचा अभ्यास करताना माणसाने कापलेले हाड आणि नैसर्गिकरित्या तुटलेले हाड यात फरक करता येतो.यावरून प्राचीन काळात मनुष्याचे अस्तित्व किती काळापूर्वीपासून होते,याचा अंदाज करता येणे शक्य आहे".

डॉ.ढवळीकर ,डॉ.पेशवा ,श्री. बलकवडे ,श्री.चव्हाण यांचीही भाषणे या वेळी झाली.

हा लेख वसुंधरा शर्मा यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


संभाजी राजे कैदी कसे झाले?

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील तेरावा लेख :

संभाजी राजे कैदी कसे झाले?
---------------------------------

संभाजी महाराजांच्या अविश्रांत युद्ध कारवाया पाहून साहजिकच प्रश्न पडतो कि एवढा रणझुंजार व धोरणी सेनानी मोगलांचा कैदी कसा झाला? संभाजीराजे सतत दहा वर्षे अखंड लढत राहिले. असे असतांना शत्रूने अचानक झडप कशी घातली?

- संभाजी महाराजांच्या तीनशेव्या पुण्यतिथी निमित्त वेगळा प्रकाश टाकणारा लेख.

एखादा माणूस दुर्दैवी आहे असे आपण अनेकदा म्हणतो ते सर्वार्थाने खरे असते म्हणूनच! तसे नसते तर संभाजीराजे मोगलांचे कैदी झाले हि एकच गोष्ट गेली तीनशे वर्षे जनमानसात टिकून राहिली नसती. १६८० मध्ये शिद्दीच्या ताब्यातील मुंबई जवळील उंदेरी बेटावर निकराचा हल्ला चढवणाऱ्या आणि पुढील जवळजवळ दहा वर्षे शिद्दी. पोर्तुगीज आणि मोगल सम्राट औरंगझेब या तीन शत्रुंविरुद्ध उसंत न घेता प्रभावी संघर्ष चालू ठेवणारे संभाजीराजे मोगलांचे कैदी झाले. पण हि एकच गोष्ट मराठ्यांच्या इतिहासातील या प्रकरणात लोकांच्या लक्षात राहिली.

एकदा युद्ध सुरु झाले म्हणजे वरिष्ठ सेनापती एकतर शत्रूवर मात करून विजयी होतो नाहीतर स्वीडनचे रणझुंजार राजे गुस्टाव्हस अडोल्फस यांच्याप्रमाणे मृत्यूला कवटाळून शहीद होतो किंवा नेपोलियन प्रमाणे शत्रूचा कैदी होतो. युद्ध हा खेळाचाच एक भाग आहे. पण संभाजीराजांच्या बाबतीत असे म्हटले जाते कि कैदी झाले त्यावेळी ते मद्यपानात गर्क होते. हा लोकप्रवाद म्हणजे त्या दुर्दैवी छत्रपतीचा आणखी घोर अवमान! प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीचा आढावा घेतल्यास आणि त्या परिस्थितीचे लष्करी मूल्यमापन केल्यास हा आरोप निराधार असल्याचे व इंग्रज आणि इस्लामी इतिहासकारांच्या पूर्वग्रहदुषित मतांवरच उभारला असल्याचे स्पष्ट होते. फारतर एवढेच म्हणता येईल मुकर्रबखान या मोगल सेनापतीचा युद्धव्यवहार संभाजी राजांच्या अंदाजावार मात करणारा ठरला. ऑगस्ट १६८० ते मार्च १६८९ पर्यंतच्या संभाजी महाराजांच्या अविरत लष्करी कार्यावाहीचा तपशीलवार आढावा व लष्करी मूल्यमापन आमच्या अभ्यासकेंद्रात करण्यात आलेले आहे. आणि जवळजवळ एक स्वतंत्र ग्रंथ होईल इतके ते विस्तृत आहे. आजच्या लेखात संभाजी राजांच्या युद्ध कारवायांचा आढावा घेवून संगमेश्वर मुक्कामी ते संभाजीराजे मोगलांचे कैदी कसे झाले याच मुद्द्यांवर जास्त भर देण्यात आला आहे.

शिद्दीविरुद्ध संघर्ष :- शिवछत्रपतींच्या निधनानंतर ज्या परिस्थितीत संभाजी राजांनी मराठी सत्तेची सूत्रे हाती घेतली, त्या परिस्थितीत त्यांना बाह्य आणि अंतर्गत धोके निर्माण होणे हि गोष्ट अटळ होती. १६८० च्या उत्तरार्धात पश्चिम किनार्यावर असणाऱ्या शिद्दीने विरुद्ध आक्रमक हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे या शत्रूला प्रथम आवर घालणे आवश्यक होते. शिद्दीवरील स्वारीची पूर्वतयारी म्हणून उंदेरी या छोट्या बेटावर प्रथम हल्ला करण्याचे संभाजीराजांनी ठरवले. त्याप्रमाणे नागोठाणे येथे असलेल्या जवळजवळ तीन हजार सैनिक व २२ गलबते यांच्या एका मराठी काफिल्याने ऑगस्ट १६८० मध्ये उंदेरीवर हला चढवला, परंतु शिद्दीने हा हल्ला परतवून लावला. या अपयशाने खचून न जाता ७ जुलै १६८१ च्या पाहते मराठी आरमाराने उंदेरीवर दुसरा हल्ला चढविला. हा हल्लाही अयशस्वी झाला.

दंडराजपुरीस वेढा :- उंदेरीवरील दोन हल्ले अयशस्वी झाल्यामुळे संभाजीराजांनी आपले लक्ष दंडराजपुरी या शिद्दीच्या दुसर्या सागरी केंद्राकडे वळवले. सागरी बाजूने हल्ल्याची सुरुवात न करता मराठी मुलखातून पुढे सरसावून ऑक्टोबर १६८१ मध्ये मराठी सैन्याने दंडराजपुरीस वेढा घातला आणि सतत १५ दिवस तोफखान्याचा भडीमार करून किल्ल्याच्या भिंती जमीनदोस्त केल्या. आपल्या ठाण्याचा बचाव करणे अशक्य आहे, हि जाणीव झाल्यावर शिद्दीने दंड्याहून माघार घेवून जंजिरा या आपल्या मुख्य ठाण्याचा आश्रय घेतला. हे सर्व चालू असतांनाच शिद्दीने चौलपासून पनवेल पर्यंत आपले हल्ले चालूच ठेवले. त्यामुळे शिद्दीवरील निर्णायक टप्पा कार्यान्वित करणे जरूर  होते. डिसेंबर १६८१ च्या अखेरीस वीस हजार सैनिक बरोबर घेवून संभाजी राजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली जंजिऱ्यावर चढाईस  प्रारंभ केला. मराठी तोफखान्याने हल्ला सुरु करून लढाईस तोंड फोडले, पण मुख्य अडचण अशी होती कि, समुद्रात असलेला जंजिरा किल्ला आणि मुख्य प्रवेशाच्या तोंडावर असलेली मराठी सेना यांच्यामधील किनारपट्टीवर शिद्दीची जहाजे गस्त घालीत होती. त्यामुळे नुकसान सोसूनही परतीकर करणे शिद्दीस शक्य होते. हि अडचण दूर करून कोंडी फोडण्याच्या दृष्टीने संभाजी राजांनी एक धाडसी प्रयोग करण्याचे ठरवले. जंजिऱ्याचा किल्ला आणि मराठी ठाणी यांमध्ये असलेली छोटीशी खाडी भरून काढण्यासाठी मोठमोठ्या शिळा, दगड, खाडी, वृक्षांचे बुंधे व फांद्या हेसार्व जल मार्गात टाकले. मराठी सेनेला किल्ल्याच्या प्रत्यक्ष भिंतीपर्यंत पोहचता यावे हा उद्देश होता. या सर्व कामावर संभाजी राजांनी स्वतः देखरेख ठेवली होती. सैनिकांचे मनोधैर्य वाढावे म्हणून किल्ला सर झाल्यास प्रत्येक सैनिकाला अर्धा शेर सोने व चांदीची कडी त्यांनी देवू केली. एवढ्या निश्चयपूर्वक केलेल्या तयारीनंतर जंजिरा किला हस्तागतही झाला असता, परंतु याच सुमारास मोगल सरदार हसन अलीखान याने कल्याण भिवंडीवर चाल करून दोन्ही गावांना वेढा घातला असल्याचे वृत्त येवून धडकले. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम दुय्यम सेनापतीवर सोपवून राजांनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली. निवडक सैनिकांना घेवून ते हसन अलीच्या पारीपत्यासाठी रवाना झाले व जंजिरा अजिंक्यच राहिला.

पोर्तुगीजांशी संघर्ष :- संभाजी राजांच्या काळात दीव-दमण पासून गोव्यापर्यंत सुमारे ९०० किलोमीटर लांबीच्या पश्चीम किनारपट्टीवर पोर्तुगीजांची नाविक सत्ता अबाधित होती. शिवाजी महाराजांचे पोर्तुगीजांशी असलेले मित्रत्वाचे संबंध कायम ठेवण्यासाठी संभाजी राजांनीही रायजी पंडित नावाचा आपला वकील गोव्याच्या व्हॉईसरॉय कडे रवाना केला. परंतु १६८१ मध्ये औरंगझेब बादशहा दक्षिणेत उतरल्याची आणि त्याने शिद्दी व पोर्तुगीज या दोन मराठा विरोधी सत्तांशी हातमिळवणी केल्याची खबर संभाजीराजांना कळली. त्यामुळे पोर्तुगीजांवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने गोव्यापासून दक्षिणेकडे कारवार जवळ असलेल्या अंजदीव या बेटावर हल्ला करून ते ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरवले. मराठा आरमाराच्या एका तुकडीने ते १६८२ मध्ये ताब्यात घेतलेही. परंतु पोर्तुगीजांनी प्रतिकारात्मक कारवाई करताच डिचोली ठाण्याचा सुभेदार शिवाजी विनायक यास पोर्तुगीजांच्या पॉलो या बेटावर हल्ला करण्याचे आदेश संभाजीराजांनी दिले. मोगल आणि पोर्तुगीज त्यांची युती मोडून काढली नाही तर मराठी राज्याला धोके निर्माण होतील हे लक्षात घेऊन संभाजी राजांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले. त्यादृष्टीने कुंडलिका खाडीच्या काठावर आणि रेवदंड्यास पूर्वेस चौल नावाचे पोर्तुगीजांचे लष्करी, नाविक व व्यापारी केंद्र होते, तिकडे ते गेले. मे १६८२ मध्ये मराठ्यांनी चौलच्या किल्ल्यास वेढा घातला. परंतु पोर्तुगीजांचा प्रतिकार प्रभावी ठरल्यामुळे तेथून माघार घेऊन रेवदंड्याच्या दक्षिणेस असलेल्या कोरलाई या ठाण्यावर हल्ला केला. कोरवाईच्या बचावासाठी चौलमधून कुमक पाठवली गेली. त्याचा फायदा घेऊन २२ जुलै १६८२ ला निळो मोरेश्वर या मराठी सरदाराने चौलवर दुसरा हल्ला चढवला. परंतु पोर्तुगीज तोफखान्याविरुद्ध तो अयशस्वी झाला. आक्रमक कारवाई सातत्याने करण्यासाठी संभाजी राजांनी जानेवारी १६८३ मध्ये डहाणूच्या दक्षिणेस असलेली तारापूर व माहीम हि ठाणी ताब्यात घेतली. हि खबर मिळताच औरंगझेबने बहाद्दरखानास रवाना केले. त्याने तारापूर व माहिमवर हल्ला करून ती परत मिळवली. या घटना घडल्या तरी राजांनी आपल्या धोरणात कोणताही बदल केला नाही. उलट १५ एप्रिल १६८३ ला ५००० पायदळ व १००० घोडेस्वार घेऊन राजे स्वतः मैदानात उतरले व तारापूरवर जोरदार हल्ला करून त्यांनी ते पुन्हा ताब्यात घेतले. चढाईचा वेग कायम ठेवण्यासाठी तारापूर हे स्ट्रॉंग पॉईंट बनवून त्यांनी मराठी तुकड्या डहाणू, दमन आणि वसईकडे रवाना केल्या. हे झाल्यावर ऑक्टोबर १६८३ मध्ये ८००० ची एक ताजी तुकडी घेऊन संभाजीराजे स्वतः चौलच्या परिसरात दाखल झाले. मराठी मुलखातून चौलची नाकेबंदी करून मराठी तोफखाना चौलच्या किल्ल्यावर आग ओकू लागला. शेकडो पोर्तुगीज अधिकारी व सैनिक चौलमधून बाहेर पडले व त्यांनी मुंबई व गोव्याची वाट धरली. मराठ्यांच्या या आक्रमक कारवायांमुळे त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी गोव्याच्या व्हॉईसरॉयने मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या फोंडा किल्ल्यावर हल्ला करण्याचे ठरवले.

किल्ल्याचा बचाव :- १ मे १६८३ ला पोर्तुगीज सेना फोंड्याच्या परिसरात दाखल झाली. फोंड्याचा किल्लेदार येसाजी कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांनी केवळ ६०० सैनिकांच्या मदतीने किल्ल्याचा बचाव सुरु केला. संभाजीराजांचे या घटनांकडे बारकाईने लक्ष होते. किल्ला फार काळ लढवला जाणार नाही म्हणून ४-११-१६८३ ला त्यांनी ३००० सैनिकांची एक ताजी तुकडी फोंड्याकडे पाठवली. या तुकडीस पोर्तुगीजांनी अडवले. हि बातमी येताच राजे स्वतः फोंड्याकडे निघाले. त्यांनी ही तुकडी स्वतःच्या नेतृत्वाखाली घेतली आणि आजूबाजूस पोर्तुगीज सैन्य आणि तोफा असतांना त्यांच्या देखत किल्ल्यात प्रवेश केला. पोर्तुगीजांनी माघार सुरु केली या माघारीत डॉम रॉड्रिगो डिकोस्टा हा पोर्तुगीज सेनानी मारला गेला व त्याच्या सैन्याने पणजीची वाट धरली. पोर्तुगीजांना समूळ नष्ट करावे म्हणून पंधरा हजार पायदळ आणि सात हजार स्वार बरोबर घेऊन संभाजीराजे स्वतः गोव्याच्या स्वारीवर निघाले. प्रथम त्यांनी मांडवी नदीच्या मध्ये असलेल्या जुवे बेटावर हल्ला करून ते ताब्यात घेतले आणि प्रत्यक्ष पणजीवर हल्ला करण्याची तयारी सुरु केली. एवढ्यात मांडवीला अचानक पूर आला त्यामुळे कारवाई स्थगित झाली. याच सुमारास म्हणजे १६८३ च्या प्रारंभी पोर्तुगीज आरमाराने आग्वाद, कलंगूठ व मडगाव या मोक्याच्या ठिकाणी येऊन मराठ्यांची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत पुढे काय करावे असा विचार चालू असतांनाच औरंगझेब पुत्र शहा अलम भारी सेना घेऊन दक्षिणेत उतरल्याची खबर आली. त्यामुळे पोर्तुगीजांशी तहाची बोलणी करण्यासाठी आपला वकील पाठवून राजे महाराष्ट्राकडे निघाले.

मोगलांविरुद्ध संघर्ष :- शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर (३ एप्रिल १६८०) राजपुतांबरोबरच्या लढाईत गुंतलेल्या औरंगझेबाने तातडीची कारवाई म्हणून बहाद्दरखानला खान इ जहान असा किताब देवून त्याला दक्षिणेकडे मराठ्यांच्या पारिपत्यासाठी रवाना केले. (मे १६८०) इथपासून ते संभाजी राजांना संगमेश्वर मुक्कामी अटक होईपर्यंत जवळपास १० वर्ष मराठे व मोगल यांचा संघर्ष चालू होता. खुद्द बादशाह प्रथम बऱ्हाणपूर, नंतर औरंगाबाद व नंतर अहमदनगर येथे आपल्या छावण्या बदलत राहिला. त्याच्या हाताखालचे २०-२५ मातब्बर सेनापती व जवळजवळ दोन लाखाची सेना घेवून औरंगझेबने चौफेर लढाई चालू केली. यातून मराठी सत्ता वाचली कशी हेच एक आश्चर्य मानावे लागेल. अशा परिस्थितीत संभाजी राजांनी स्थळ आणि काल यांचा समन्वय साधून जी युद्धनीती वापरली तिला खच्चीकरणाची युद्धनीती (वार ऑफ अटरीशन) असे नाव देता येईल. शत्रूने एखाद्या ठिकाणी हल्ला केल्यास त्याच्या पाठोपाठ प्रतिहल्ले करणे, शातृसेनेचे मनुष्यबळ व साधन सामुग्री यांचे शक्य शक्य तितके नुकसान करणे व शत्रू अनावर होतो आहे असे दिसताच तेथून पद्धतशीर माघार घेवून विरुद्ध दिशेला असलेल्या शत्रुस्थानावर हल्ला चढवणे हि अशा तऱ्हेच्या युद्धनीतीची प्रमुख सूत्रे म्हणून सांगता येतील. १६८० च्या उतरार्धात मोगलांनी नाशिक जवळचा अहिवंत गड घेतला तर मराठ्यांनी आपले चार गट करून एक गट सुरतेकडे, दुसरा बऱ्हाणपूर कडे व तिसरा औरंगाबाद कडे तर चौथा सोलापूर कडे हल्ले करण्यास रवाना केला. १६८१ मध्ये नगर सोलापूर व औरंगाबाद या मोगली किल्ल्यांवर हल्ले करून मोगलांन हैराण केले व शिवाय साल्हेर आणि मुल्हेर व पेडगाव उर्फ बहाद्दरगड हे किल्ले परत मिळवण्यासाठी निकराच्या लढाया दिल्या. १६८२ मध्ये नोगल सरदार हसन अली खान ने दक्षिण कोकणात चढाई करून दाभोळ व राजापूर हे भाग काबीज केले व तो कल्याण भिवंडीकडे वळला. त्याच्या प्रतिकारास  संभाजीराजे स्वतः कल्याण भिवंडी कडे गेल्यामुळे हसन अली खानास बादशाहने रामसेजच्या किल्ल्यावर हल्ला करण्याची आज्ञा केली. हा किल्ला ६-७ महिने लढवला गेला व तो हाती येत नाही असे पाहून मोगल सैन्याने औरंगाबादकडे माघार घेतली. इकडे मराठ्यांनी सोलापूर, पंढरपूर, टेंभुर्णी येथील मोगल स्थानकांवर हल्ले करून त्यांची कोंडी केली आन त्याचबरोबर संगमनेर व सिन्नर येथील मोगली स्थानकांवर हल्ले करून त्यांची कोंडी केली आणि त्याच बरोबर संगमनेर व सिन्नर येथील मोगली ठाण्यांवर हल्ले केले. १६८३-८४ मध्ये कासीमखान व सहुल्लाखान यांच्या सेनांनी कल्याण भिवंडीवर पुन्हा हल्ले केल्यामुळे संभाजी राजांचे लक्ष तिकडे वेधले. सुरतेहून येणारी रसद तोडून टाकण्यासाठी त्यांनी मराठी आरमार उरण खाडीत ठेवले. याच वेळी ठाणे जिल्ह्यातील कोथळागड लढविला गेला, परंतु अब्दुल कादर व सहुल्लाखान यांच्या संयुक्त फौजांनी जोरदार हल्ला केल्यामुळे मराठ्यांन माघार घ्यावी लागली. १६८५ मध्ये मोगलांनी साताऱ्याजवळील खटाव येथे आपली छावणी प्रस्थापित केली अशी खबर येताच हंबीरराव मोहित्यांनी खटाव वर हल्ला केला. याचवेळी गझिउद्दिन फिरोजजंग या नोगल सरदारांनी शिरवळ वरून खटाव च्या रक्षणासाठी धडक मारली. त्याबरोबर नागोजी बल्लाळ या मराठी सरदाराने चंदन-वंदन हे मार्गातील किल्ले ताब्यात घेवून गाझीउद्दीनचा मार्ग रोखला. अशा रीतीने १६८० ते ८५ हि सहा वर्षे संभाजीराजांनी मोगल सैन्याला उसंत मिळू दिली नाही.

दक्षिण भारतातील चढाई :- १६८१ च्या उत्तरार्धात मोगलांचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजांनी हरजीराजे महाडिक या मातब्बर मराठी सरदारास २०००० सेना धुवून दक्षिणेकडे रवाना केले. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय याने वरकरणी मराठ्यांशी मैत्री दाखवून आतून बादशाहाशी संधान बांधले. दक्षिणेकडे ३२० किलोमीटर धडक मारून मदुरा ताब्यात घेतले. त्यामुळे तंजावर व पश्चिमेकडील त्रीचीनापल्ली आणि पूर्वेकडील नेगापट्ट हि मराठी स्थानके धोक्यात आली. चीक्क्देव्राय व मोगल यांची युती मोडून काढणे आवश्यक असल्यामुळे तीस हजाराचे घोडदल बरोबर घेवून संभाजीराजे स्वतः सातारा, मिरज, हुबळी, धारवाड या मार्गाने चिकमंगरूळ कडे रवाना झाले. म्हैसूरवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चिक्कदेवरायचा शत्रू मादुरेचा नायक याच्याशी लष्करी करार करून व तंजावरच्या एकोजी राजांच्या तुकड्या घेवून १६८३ च्या जानेवारीत संभाजी राजांनी म्हैसूर च्या पूर्वेस धर्मपुरी येथे आपली छावणी प्रस्थापित केली. ऑक्टोबर ८३ मध्ये संभाजी राजांनी चित्रनापल्ली कडे जाऊन मदुरेचा कब्जा घेतला. व तेथून पूर्वेकडे वळून मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम व पोर्टोनोब्से येथे मराठी अंमल बसविला. या आक्रमक हालचालींमुळे चिक्कदेवरायाने मराठ्यांशी तहाची बोलणी सुरु केली. त्यांच्याशी शस्त्रसंधी करून मध्य महाराष्ट्रात होणाऱ्या मोगली आक्रमणाला थोपविण्यासाठी राजे रायगडला परतले.

शेवटची लढाई :- आतापर्यंत वर्णन केलेल्या संभाजी राजांच्या अविश्रांत युद्ध कारवाया पाहून साहजिकच असा प्रश्न पडेल कि इतका धोरणी व रणझुंजार सेनानी सहजगत्या मोगलांचा कैदी कसा झाला? आजकालच्या सतत दोन तीन आठवडे चालणाऱ्या लढायांत सैनिक आणि सेनाधिकारी थकून गेल्याचे मी स्वतः पहिले आहे. संभाजी राजे दहा वर्षे अखंड लढत राहिले. त्याअर्थी ते व्यक्तिमत्व म्हणजे मानवी उत्साहाचा अखंड झराच म्हणावा लागेल. असे असतांना त्यांच्यावर शत्रूने अचानक कशी झडप घातली?
आदिलशाही नष्ट झाल्यावर मराठ्यांच्या अनेक छोट्या तुकड्या विजापूर परिसरातील शासकीय यंत्रणा खिळखिळी करावयाच्या दृष्टीने तेथे हल्ले करण्यास बाहेर पडल्या. हि खबर येताच १६८७ च्या सप्टेबर मध्ये बादशहाने गोवळकोंड्याहून आपली छावणी हलवून तो विजापुरकडे निघाला. जानेवारी १६८८ मध्ये विजापुरास छावणी असतांना सर्जा खान व शेख जमालुद्दीन हैद्राबादी हेदिन प्रमुख आदिलशाही सरदार बादशहा बरोबर होते. फेब्रुवारी १६८८ मध्ये शहाआलम व गाझिउद्दिन यांनी ४०००० घोडदळ देवून प्रथम बेळगावचा किल्ला सर करून पुढे कोल्हापूरपर्यंत धडक मारण्याची बादशहाची आज्ञा झाली. या सुमारास संभाजी राजे रायगड येथे होते. संभाजी राजांच्या प्रत्येक हालचालींवर औरंगझेबाचे लक्ष होते. मोगलांनी बेळगावचा किल्ला घेतल्याचे वृत्त त्याना समजताच यापुढील हल्ला कोल्हापूरहून पन्हाळ्यावर होणार हे त्यांनी ताडले. पन्हाळ्याची सुरक्षा  मजबूत करण्याच्या हेतूने राजे स्वतः पन्हाळ्याकडे निघाले. इकडे ऑक्टोबर १६८८ मध्ये बादशहा विजापूरहून अकलूज मार्गे मिरजेस पोहचला. यावेळी संभाजीराजे पन्हाळ्याची व्यवस्था करून विशाळगडावर गेले आहेत व तेथील संरक्षण व्यवस्था मजबूत करून राजे रायगडावर जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त शिर्क्यांकडून बादशहाला मिरज मुक्कामी कळले. मिरजेच्या मुक्कामात संभाजीराजांच्या निश्चित हालचालींची बातमी बादशहाला कळताच त्याने शेख हैद्राबादी यास मुकरर्रबखान हा किताब बहाल करून व त्याला वीस हजाराची सेना देऊन काय वाटेल ते करून संभाजीराजांचा पाठलाग करावा व त्यांना जिवंत अथवा मृत ताब्यात घ्यावे असा हुकूम दिला.

लष्करी अनुवाद :- या घटनेपर्यंतच्या सर्व गोष्टी अनेक बखरीतून व ग्रंथातून ज्ञात आहेत. परंतु मुकर्रबखानाने राजांना कसे पकडले याबद्दल इतिहासकार काहीच बोलत नाहीत. नेमक्या याच ठिकाणी लष्करी विश्लेषणाची जरुरी आहे. जर मी स्वतः मुकर्रबखान असतो तर मी काय केले असते या एकाच प्रश्नाने याचे उत्तर मिळणार आहे. संभाजीराजे विशाळगडाची व्यवस्था लावून रायगडकडे परत जातांना शत्रूने पाठलाग केल्यास तो आंबेघाटावरूनच येईल असे अनुमान करून त्यांनी घाटाच्या तोंडावर मलकापुरास पाच हजार स्वार पाठविल्याचे इतिहास सांगतो. अशा परिस्थिती मुकर्रबखान पुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे आपल्यासैण्याचा एक मोठा गट मिरज-कोल्हापूर (अंतर ७२ किलोमीटर) मार्गाने रवाना करणे. या चालीचा उद्देश डेमोस्ट्रेशन अथवा ‘फेंट’ हा असून आपण कोल्हौपुरातून मलकापूर मार्गेच जात आहोत असा भास निर्माण करणे, दुसरा पर्याय म्हणजे निवडक मनसे घेवून कोणत्यातरी अनपेक्षित मार्गाने थेट संगमेश्वरावर उतरणे. माझा सा कयास आहे कि कऱ्हाडच्या पश्चिमेस सह्याद्रीची जी रांग आहे त्यातून थेट कोकणात उतरण्यासाठी माल, बुडी व तिवरा हे तीन घाट आहेत. यापैकी मिरज-कऱ्हाडवरून (अंतर ९६ किलोमीटर) पाटण हेळवाक मार्गाने मुकर्रबखान तिवरा घाटातून नायटी या गावाजवळ उतरला व त्याने संगमेश्वरला शिव मंदिरात असलेल्या संभाजी राजांची नाकेबंदी केली व त्यांन कैद केले.

मुकर्रबखानला या गोष्टीची निश्चित कल्पना असेल कि मलकापूरहून गेल्यास मराठी स्वारांबरोबर लढत द्यावी लागेल व संभाजीराजे सावध होतील. म्हणून मिरज कोल्हापूर मार्गावर फेंट टाकून तो स्वतः २००० घोडदळ व १००० पायदळ घेवून तिवरा मार्गे संगमेश्वरला उतरला असणार. इकडे शत्रू आल्यास ते मलकापूर हून येईल या अंदाजाने राजे संगमेश्वरात निर्धास्त होते. ३०० वर्षांपूर्वी या भागातील वनस्पती व जंगल खूपच असले पाहिजे म्हणून खानाने घोडदळाचा मार्ग सुकर करण्यासाठी १००० पायदळ घेतले व तातडीची हालचाल करता यावी म्हणून २००० स्वार बरोबर घेतले असावेत. मुकर्रबखान संगमेश्वरी उतरला त्यावेळी संभाजी राजे शिवाच्या अनुष्ठानास बसले होते व एकदा अनुष्ठान चालू झाल्यावर मध्येच उठता येत नाही म्हणून ते खानाच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकले नाहीत. हे लष्करी विवेचन मान्य झाल्यास तीच संभाजी राजांना खरी श्रद्धांजली ठरेल.
३०० व्या बलिदान प्रसंगी मला दोन सूचना कराव्याश्या वाटतात. पहिली हि कि मी म्हणतो त्याप्रमाणे तीव्र घाटातून नायरी मार्गे संगमेश्वरास उतरणे शक्य आहे का याचा शोध शासकीय वा अशासकीय पातळीवर करण्यात यावा. दुसरी म्हणजे अंजदीव या बेटावर आशियातील सर्वात मोठा नाविक तळ उभारण्यात येत आहे. त्यास आय एन एस संभाजी हे नाव द्यावे. अंजदीव बेत ताब्यात घेवून तेथे नाविक तळ उभारणारे संभाजीराजे हे अग्रणी भारतीय सेनानी होते आणि तेही पोर्तुगीजांवर नजर ठेवावी म्हणून. हीच संभाजी महाराजांना राष्ट्रीय श्रद्धांजली ठरेल.

लेखिका - डॉ. म. ग. अभ्यंकर
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. वैभव तुपे यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.














"आर्यन" ते "ई-स्क्वेअर"

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील बारावा लेख :

चित्रपट गृहात खास महिलांसाठी 'लेडीज डोअर किपर' तुम्ही कधी पाहिलीय ? प्रेक्षक चित्रपटगृहाकडे आकर्षित व्हावेत म्हणून चक्क त्यांचं दळण फुकट देणारा रसिकप्रिय मालक तुम्हाला माहिती आहे?  नाही ना?
तो काळ होता १९१५ चा.त्यावेळी चित्रपट पाहणं म्हणजे थोड रीतीला सोडून वागल्यासारखं होत. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुण्यात मोठ्या डौलाच चित्रपटगृह उभारणार्या रसिकवेड्याचं नाव आहे गंगाधरपंत ऊर्फ बापूसाहेब पाठक.

पुण्यातील पहिलं चित्रपटगृह 'आर्यन' सुरू करण्याचा मान त्यांच्याकडेच जातो.त्याच्या उभारणीची तारिख होती ७ फेब्रुवारी १९१५.फुले मडंई समोरील प्रशस्त जागेत उभ्या राहीलेल्या या चित्रपटगृहानं सलग ६७ वर्षे रसिकांच्या मनावर राज्य केलं.१९४० ते ४२ पर्यंत आणखी काही चित्रपटगृहं पुण्यात उभी राहिली त्यात प्रामुख्यानं 'मिनर्व्हा', 'प्रभात', 'श्रीकृष्ण', 'विजयानंद', 'डेक्कन', 'विजय', 'भानुविलास', 'वसंत', 'कँपिटॉल', 'वेस्टएंड', 'एम्पायर', नोव्हेल त्याचबरोबर 'भारत'(निशात), 'ग्लोब' (श्रीनाथ), 'शिरीन'(अल्पना), 'पँरेमाऊंट'(रतन) होती.

हा सारा काळ ब्रिटीशांच्या राजवटीचा होता. चित्रपटांची मांडणी,विषय, तंत्र सारं अनोखं होतं. पौराणिक, ऐतिहासिक आणि ज्वलंत सामाजिक विषय मांडले जात होते. सन१९३१ च्या सुमारास 'आलमआरा'च्या निमित्तानं चित्रपटसृष्टित बोलपटाचं पर्व सुरू झालं.                
     
व्ही.शांताराम, फत्तेलाल-दामले, बापूसाहेब करंदीकर, पांडूरग तलगेरी, नानासाहेब सरपोतदार यांचे स्टुडिओ ही याच काळात उभे राहिले. आता मिळून दहा वर्षे झाली होती. चित्रपटगृहात ३५ एम.एम.चे पडदे आले होते.साऊंड सास्टिमही सुधारली होती. 'ईस्टमनकलर'चे 'ज्युबली' चित्रपट गर्दी करू लागले.आता डेक्कन आणि लष्करी छावणीच्या पलिकडेही चित्रपटगृहे थाटू लागली. यानंतर १९६५-६८ च्या सुमारास चित्रपटगृहांनी कात टाकली. ३५ एम.एम ची साथ सोडुन ७० एम.एम.च्या पडद्यांची चित्रपटगृहे पुण्यात आली. 'नटराज' (पुर्वीचे हिंदविजय), 'राहुल', 'निलायम', 'अलंकार','अपोलो', लक्ष्मीनारायण', 'मंगला' ही त्यातील काही नावं. भव्य पडद्याबरोबरचं या चित्रपटगृहांतुन 'स्टिरिओ साऊंड' दणाणू लागला. त्यानंतर मात्र चित्रपटगृह चालविणे कठिण जाऊ लागलं. याच पार्श्वभुमीवर चारूदत्त सरपोतदार यांच्यासारख्या हरहुन्नरी व्यक्तीनं 'मराठी चित्रपट महामंडळ' स्थापण करून मराठी चित्रपट जिवत ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा टिकला नाही.ऐतिहासिक 'आर्यन' आणि लगोलग 'मिनर्व्हा' जमिनदोस्त झाली.'भानुविलास'ही बंद पडलं.'रतन', 'वसत', 'नटराज' आणि 'वेस्टएंड'च्या मालकांनी चित्रपटगृह चालविण्यापेक्षा ती जमिन बांधकाम व्यावसायिकांना विकली.

पुणं आता पेंशनरांच किंवा टांगेवाल्यांच राहिलं नव्हतं.बदललेल्या पुणेकरांची नाडी चतुर व्यावसायिकानी ओळखली आणि त्याच्या प्रयत्नांतुन 'सिटी प्राईड', 'आयनॉक्स' आणि 'ई-स्क्वेअर' सारखी विविध अंगानी मनोरंजनाचा अनुभव देणारी मल्टिप्लेक्स डौलान येथे उभी राहिली. आज पुण्यात तिन ' मल्टिप्लेक्स' असून कोथरूड भागात 'सिटी पँव्हेलियन' नावाचं आणखी एक 'मल्टिप्लेक्स' लवकरच सुरू होत आहे.'मंगला'च्या ठिकाणी 'मल्टिप्लेक्स' होण्याची शक्यता आहे.

बापू वाटवे, रामभाऊ गबाले, चारूदत्त सरपोतदार या मंडळींनी पुण्याच्या चित्रपटगृहांचा इतिहास पाहिला आहे. या क्षेत्रातील घटनांचे ते साक्षिदार आहेत. ते म्हणतात, "पुण्याची जीवनशैली बदलली आहे. त्यानुसार आपल्यालाही बदलावं लागेल हे खरं आहे. मात्र मल्टिप्लेक्स चा आनंद लुटताना मनात कुठेतरी 'आर्यन'चाही विचार यावा." या विचारातच 'पुणेरीपण' दडलेल आहे.

लेखिका - सुरेश ठाकोर
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. योगेश वाघमोडे, राजगुरुनगर यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.






इतिहासाचा साक्षीदार - विश्रामबागवाडा

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील अकरावा लेख :

         
(दैनिक -सामना, रविवार १८नोंव्हे.२००१)                          

इ. स.१७९८चा काळ पुण्यातील शनिवारवाड्यात कौटुंबिक कलह विकोपाला गेले होते.त्यातच नारायणाचा खून.अशात राजकीय परिस्थिती यामुळे दुसरे बाजीराव पेशवे नव्या, शांत अश्या निवासाच्या शोधात होते.पुण्यात बुधवार वाडा ,शुक्रवार वाडा आणि दुस्तर खुद्द पेशवांचा शनिवार वाडा असूनही अंतर्गत कलहामुळे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना नव्या वाड्याचे वेध लागले होते.                            

पुण्यातील सध्याच्या लक्ष्मी रोडवरील जागेत पेशवाईच्या काळात हरिपंत फडक्यांची बाग होती.दुसऱ्या बाजीरावांना नवीन वाड्याकरिता ही जागा पसंत पडली.त्यांनी ही जागा इ. स.१७९८ ला विकत घेण्याचा मनोदय हरिपंत फडक्यांकडे व्यक्त केला.फडक्यांनी ही जागा पेशव्यांना बक्षीस म्हणून देऊन ही टाकली . पुण्यातील अशांत राजकीय परिस्थिती मुळे प्रत्यक्ष बांधकामास इ. स.१८०३ला सुरुवात झाली.वाड्याच्या बांधकामाचा ठेला मानसाराम लक्ष्मण  नाईक व दाजी सुतार यांना ७५हजार रूपयांच्या मजुरीवर मुक्रर करण्यात आला.दोघांनीही  मोठे कसब  पणास लावून वाड्याची उभारणी केली.या वाड्याची लांबी २६०फूट व रुंद ९०फूट ठेवली होती .
संपूर्ण शिसवी खांब लाकडावरील नक्षीदार पिसारा फुलविलेले मोर, आक्राळ विक्राळ सुसरी, दर्शनी भागात लाकडावर उत्कृष्ट कोरीव काम केलेली मेघडंबरी असा पेशवाई चा दिमाख दाखवणारा हा वाडा उभारताना त्या काळात २ लाख ५४ हजार रुपये इतका खर्च आला.          

मराठेशाहीच्या अस्तानंतर इंग्रज राजवटीत इ. स.१८२१ मध्ये दख्खनचे त्यावेळेचे कानेनरा मि. चॅपलीन यांचा मान्यतेनुसार विश्रामबाग वाड्यात वेदांचे व शास्त्रांचे शिक्षण देणारी पाठशाळा सुरु करण्यात आली.इ. स.१८४५ मध्ये  ही पाठशाळा बंद करुन खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात आली.मराठी शब्दकोषाचे लेखक मेजर कँडिना शाळेच्या स्टाफचे प्रमुख बनविण्यात आले.१८५६मध्ये खाजगी  इंग्रजी शाळेबरोबरच डेक्कन कॉलेजचा कारभार विश्रामबाग वाड्यातून  नवीन इमारतीतून सुरु करण्यात आला.इंग्रजच्या ताब्यात असलेल्या या वाड्यात काही काळ वासुदेव बळवंत फडके यांनीही कैदेत ठेवल्याची नोंद सापडते

 स्वातंत्र्यपूर्व काळात इ. स.१८७९मध्ये या वाड्याला आग लागून याचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले.                    अलीकडील काळात १९८५साली शिवशाहीर बाणासाहेब पुरंदरे यांना त्यांच्या शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वस्तुसंग्रहालय आणि कार्यलयासाठी जागा हवी होती.त्याकरिता विश्रामबाग वाड्याचा काही भाग त्यांनी चाळीस वर्षा करीता भाड्याने घेतला.सदर  भागास भवानी महल असे संबोधण्यात येते.या भवानी महालात बाबासाहेबांनी छोटीशी शिवसृष्टी उभारली आहे.या भवानी महलात बाणासाहेबांनी संपूर्ण हिंदुस्थानभर फिरून मोठ्या कष्टाने जमविलेल्या ऐतिहासिक वस्तू  मोठ्या दिमाखदार पद्धतीने मांडल्या आहेत.भवानी मातेचं आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे  दर्शन घेऊन आपण ऐतिहासिक वस्तू पाहू शकता.यात इतिहास कालीन विविध प्रकारच्या तलवारी , भाले, सांग, विटा, दाणपट्टे, बंदुका, कासवाच्या पाठीच्या ढाली, तोफा , तोफगोळे, यांचे रोमांचकारी दर्शन आपल्याला होते. तसेच लामण दिवे ,हंड्या, झुंबरे, उंटाच्या कातडीपासून बनवलेला तूप साठविण्याचा हंडा, ताम्रपट, विविध किल्ल्यांची देवीदेवतांची छायाचित्रे, शिवचारित्रावरील प्रसंग चित्रे आपण येथे पाहू शकतो.
 ३५०वर्षांपूर्वी छत्रपतींच्या नेतृत्त्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या मावळयांची ही आयुध पाहून आपण नकळतच इतिहासात हरवून जातो.साक्षात आदिशक्ती तुळजाभवानी  आपल्या डोळ्यासमोर उभी टाकते आणि बाबासाहेबांनी या महलाला दिलेले भवानी महल हे नाव किती सार्थक आहे ,याची प्रचिती येते. बाबसाहेबांकडून मार्गदर्शन घेताना असे समजले की , पुण्याजवळील कात्रज जवळ याहीपेक्षा भव्यदिव्य अशी शिवसृष्टीबद्दलच्या त्यांच्या योजना कल्पना ते आम्हाला भरभरून सांगत होते. त्यांच्या बोलण्यात जबर आत्मविश्वास अगदी ठासून भरला होता. हयातभर कष्ट उपसून शिवचारित्रावरील व्याख्याने शिवकालीन हत्यारे, आयुध,भावी पिढी साठी  जमविणाऱ्या आणि याही वयात कात्रजजवळ शिवसृष्टी उभारण्याची शिवशाहिरांची जिद्द पाहून नकळत त्यांच्या समोर नतमस्तक झालो.          

विश्रामबाग वाड्याची निर्मिती होऊन जवळ जवळ दोन शतके पूर्ण होतील.तरीही पुण्याच्या सदाशिवपेठेत हा वाडा अजूनही दिमाखात उभा आहे. विश्रामबाग वाडा व त्याच्या पहिल्या मजल्यावरील भवानी महल बुधवार सोडून सकाळी ९ ते सायंकाळी ७पर्यंत सर्वांकरिता मोफत पाहण्याकरिता खुला असतो. पुण्यात जर आपण कधी  यापुढे गेलात तर पुण्याच्या गतइतिहासातील पेशवाईची व शिवशाहीची  सांगड घालणाऱ्या विश्रामबाग वाड्याला जरूर भेट द्या.                  

लेखिका - संदीप शशिकांत विचारे
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, शामल पाटील यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.