Thursday, March 2, 2017

पुण्याच्या वैभवात रेल्वेचा वाटा.

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील तेविसावा लेख :

पुण्यात पहिली रेल्वे २३ मार्च १८६४ रोजी सुरु झाली. त्यापूर्वी मुंबई ते ठाणे या भागासाठी १६ एप्रिल १८५३ रोजी ती सुरु झाली होती. मुंबई ते ठाणे हे २१ मैलांचे अंतर होते व रेल्वे ठाण्याला जाण्यास सुमारे ५६ मिनिटे लागत होती. ती काही काळानंतर कल्याणपर्यंत जाऊ लागली. परंतू पुणे ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी रेल्वेला सुमारे ११ वर्ष लागली.

भारतामध्ये ब्रिटीश राजवट सुरु व्हायला आणि ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती व्हायला एकच गाठ पडली. परिणामी, भारतामध्ये इंग्रजी राजवटीमुळे औद्योगिक क्रांती लवकर होऊ लागली. ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असे, की युरोपमधील सर्व देशांत ब्रिटनमध्ये प्रथम औद्योगिक क्रांती वेगाने झाली. ब्रिटन हा औद्योगिक प्रगतीच्या क्षेत्रामध्ये आघाडीवरील देश होता. त्यामुळे भारतातदेखील आशियातील इतर देशांच्या मानाने आधी औद्योगिक क्रांती सुरु झाली.

इंग्रजांनी रेल्वेच्या प्रगतीला मुंबईपासून सुरुवात केली व नंतरच्या काळात देखील रेल्वेची प्रगती प्रामुख्याने मद्रास, कलकत्ता व कराची या बंदरांच्या दिशेने होत होती. याचे कारण भारतातील कच्चा माल या बंदरातून ब्रिटनमध्ये न्यावा व तेथून पक्का माल भारतात आणून येथील बाजारपेठेत तो विकावा, ही त्यांची दृष्टी होती. या व्यापारी दृष्टीशिवाय संरक्षणाच्या हेतूने इंग्रजांनी वायव्य भागामध्ये रशिया, अफगाणिस्तान यांच्या आक्रमणाच्या भीतीमुळे रेल्वेची वाढ त्या दिशेनेदेखील केली होती. इंग्रजांचा दृष्टीकोन कोणताही असो, प्रारंभीच्या काळात  रेल्वेच्या वाहतुकीचा फायदा मुंबई आणि पुणे या शहरांना मोठ्या प्रमाणावर झाला.

रेल्वे मुंबईहून पुण्याला येण्यासाठी अकरा वर्षे लागली. कारण मध्ये खंडाळ्याचा बोरघाट होता. हा घाट फोडण्याचे काम ग्रेट इंडियन पेनिस्युलर रेल्वे कंपनीने १८६१ सुरु केले व ते तीन वर्षांनी पुरे करुन १८६४ पासून पुणे-मुंबई लोहमार्ग सुरु केला.

रेल्वे ही रुळांवरुन धावते, याचे पुण्यातील लोकांना सुरुवातीला आश्चर्यच वाटले. कारण बैल किंवा घोडे न जुंपता गाडी धावते हे आम्हाला कधीही माहीतच नव्हते.  त्यामुळे अनेक लोक रेल्वेत बसून खडकीपर्यंत जात व कसे वाटते, याचे वर्णन ते इतरांना अतिशय चटकदार पद्धतीने सांगत असत. सुरुवातीच्या काळात लोकांची अशी अंधश्रद्धा होती, की गाडी दर कोसाला एक बळी घेते; परंतू लवकरच ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रसारामुळे ही अंधश्रद्धा कशी चुकीची आहे, हे लोकांना समजू लागले. सुरुवातीच्या काळात मुंबई-पुणे प्रवासासाठी सहा तास लागत असत.

मुंबई विद्यापीठाची स्थापना १८.७.१८५७ रोजी झाली व मॅट्रीकची पहिली परीक्षा ६ ऑक्टोबर १९५९ रोजी मुंबई येथे झाली होती. त्या वेळी पुण्याहून या मॅट्रीकच्या परीक्षेसाठी लोणावळा खंडाळ्याला गाडीने जावे लागे व पुढे खंडाळा ते कर्जत हा घाट उतरण्यासाठी घोड्यावरुन किंवा घोडागाडीने जावे लागे. काही विद्यार्थी चालत जात. पुढे रेल्वेने मुंबईला जाण्याची सोय असे. मॅट्रीकच्या पहिल्या परिक्षेस एकूण १३२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यानंतर १८६२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा झाली. त्यावेळी बी.ए.च्या परीक्षेला फक्त सात विद्यार्थी बसले होते. त्यापैकी चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या चार विद्यार्थ्यांमध्ये पुण्याचे न्या. रानडे हे पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याशिवाय इतर विद्यार्थ्यांची नांवे रा. गो. भांडारकर, वामन आबाजी ओक व बाळ मंगेश वाबळे अशी होती. या चारपैकी दोन विद्यार्थी पुण्याचे होते. परीक्षेसाठी ते मुंबईला कसे गेले, हे न्या. रानडे यांच्या चरित्रातून वाचायला मिळते. त्यावेळी मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा कुलाबा विभागामध्ये मंडप टाकून घेतल्या जात.  

या रेल्वेचे महिलांना विशेष कुतूहल व कौतूक होते.  त्यांनी आपल्या जात्यावरील गाण्यामध्येदेखील  रेल्वेसंबंधीच्या एका गाण्याचा अंतर्भाव केला. जात्यावरील गाण्यात त्या म्हणू लागल्या
" पुणे शहरामध्ये विंग्रजाने केला कावा, लोखंडाच्या सडकेवरुन आगगाडी घेते धावा." याशिवाय रेल्वेवर त्यांनी अनेक गाणी तयार केली होती. 

पुण्यामध्ये प्रथम रेल्वे सुरु झाली त्या वेळी आता या शहरात बेकारी वाढू लागेल, लोकांचा कामधंदा बुडू लागेल व त्यांच्या हलाखीमध्ये वाढ होईल, अशी लोकांची समजूत होती. परंतु पुण्यात रेल्वे सुरु झाल्यामुळे या रेल्वेचा अगदी वेगळा परिणाम झाला. पुणे हे व्यापाराचे केंद्र बनू लागले. सातारा, नगर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांतून माल येऊ लागला व हा माल रेल्वेने अवघ्या सहा तासांत मुंबईस सुरक्षित पोचू लागला.  पुण्यातील व्यापार वाढू लागल्याने अनेकांना कामधंदा मिळाला व येथील बेकारी कमी होण्यास महत्त्वाची मदत झाली. नंतरच्या काळात पुणे हे भांडी आणि कापड यांच्या व्यापाराचे मोठे केंद्र बनले.  येथील कापडाचा व्यापार झपाट्याने वाढू लागला.  याचे एक महत्वाचे कारण म्हणजे पुणे ही पेशव्यांच्या काळापासून लग्नाची बाजारपेठ होती.  त्यामुळे साहजिकच कापडाची खरेदी विक्रीही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. शिवाय भांड्यांचाही व्यापार वाढू लागला. कारण पुण्यात तांब्या-पितळाच्या भांड्यांचे कारखाने मोठ्या प्रमाणावर वाढू लागले. १८१८ ते १८५० या काळात पुणे शहरात पेशव्यांच्या पतनामुळे जी अवकळा पसरली होती, ती १९६४ नंतर रेल्वेच्या वाहतुकीमुळे झपाट्याने कमी होऊ लागली.

डेक्कन क्वीनचा पुणे मुंबई असा प्रवास १९३० मध्ये सुरु झाला. त्या वेळी डेक्कन क्वीन ही जगातली वेगवान गाडी, असा या गाडीचा लौकीक होता. पुणे - मुंबई हे १२० मैलांचे अंतर डेक्कन क्वीन अवघ्या अडीच तासांत पार करीत होती. याच सुमारास डेक्कन क्वीन ही विजेवर चालू लागली.  त्या वेळी डेक्कन क्वीनचा प्रवास हा अत्यंत आरामशीर व हेवा वाटावा इतका चांगला होता. सर्व भारतात त्या वेळी डेक्कन क्वीनसारखा सुखाचा व वेगवान प्रवास कोठेही होऊ शकत नव्हता. आता डेक्कन क्वीनलादेखील सुमारे तीन तास पंचवीस मिनिटे लागतात. म्हणजे या सत्तर वर्षांच्या काळात डेक्कन क्वीनचा प्रवास दरवर्षी काही अंशी एका मिनिटाने वाढत गेला आहे व आता पूर्वीइतका सुखाचा प्रवासदेखील राहिला नाही. प्रारंभी या काळात रेल्वेच्या एकूण उत्पन्नाच्या ऐंशी टक्के उत्पन्न हे मालवाहतुकीचे होते. आता हे उत्पन्न खासगी ट्रकच्या वाहतुकीमुळे पुष्कळच कमी झालेले आहे.

लेखक:-डॉ. मा. प. मंगुडकर.
संकलन:-प्रा.र.भ.वनारसे
हा लेख अमोल सुधाकर शिंपी यांनी टंकीत केला असल्याने त्याचे आभार!!

टिळकांचे विश्वस्तपण - दत्तक प्रकरणातील पत्र व्यवहारातून व प्रसंगातून लोकमान्यांचं होणारं दर्शन

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील बाविसावा लेख :
--------------------------------------

औरंगाबाद मधील गुरुद्वारात १७ व १८ जून १९०१ रोजी जगन्नाथ महाराज पंडित यांचे (म्हणजे माझ्या वडिलांचे) दत्तक विधान संपन्न झाले. स्वतः लोकमान्य टिळक उपस्थित होतेच, शिवाय गावातील प्रतिष्ठित मंडळीही हजर होती. सर्वांच्या समक्ष ताई महाराजांनी जगन्नाथाला मांडीवर घेतले. सर्व विधी यथासांग पार पडला.

ताई महाराज म्हणजे पुण्यातील सरदार बाबामहाराज पंडितांच्या पत्नी, आणि बाबामहाराज म्हणजे लोकमान्यांचे जिवलग स्नेही. मृत्युशय्येवर असतांना त्यांनी गळ घातल्याने लोकमान्य ट्रस्टी व्हायला राजी झाले. बाबामहाराजांच्या इस्टेटीची देखभाल करणे व घराण्यासाठी दत्तक घेणे, हे ट्रस्टचे प्रमुख काम होते. बाबामहाराज निवर्तल्यावर दत्तक घेण्याचा प्रश्न निर्माण झाला. ट्रस्टचे अध्यक्ष असल्याने ती जबाबदारी लोकमान्यांच्या खांद्यावर येवून पडली. बाबामहाराजांच्या मूळ घराण्यातील एखादा चुणचुणीत लहान मुलगा दत्तक घ्यावा असे त्यांनी ठरवले होते.

त्यासाठीच स्वतः लोकमान्य मुलाच्या गावी म्हणजे निधोन्याला गेले होते. त्यांच्या सोबत दादासाहेब खापर्डेही होते. मूळ घराण्यातील काही मुले त्यांना तेथे दाखवण्यात आली. बाबामहाराज पंडितांच्या इस्टेटीला वारस म्हणून त्या मुलांतूनच जगन्नाथाची निवड करण्याचे ठरले. तेंव्हा जगन्नाथाचे वय केवळ सहा वर्षाचे होते. प्रत्यक्ष दत्तक विधानापुर्वी जगन्नाथ आपल्या आई-वडिलांबरोबर औरंगाबादला आलाच होता. तिथे त्याची सर्व प्रकारे परीक्षा घेण्यात आली. ताईमहाराजांच्या नजरेखालून त्याला घालण्यात आले. दुर्गेशास्त्रींनी त्याची कुंडली तपासली. त्यात मुलगा भाग्यवान असल्याचा निर्वाळा मिळालाच होता. शेवटी सर्व परीक्षात उत्तीर्ण झालेल्या जगन्नाथाचेच नाव सर्वानुमते मान्य झाले. पण ट्रस्टी कमेटीतील नागपूरकर यांचे मत वेगळे होते. कोल्हापूर कडील भाऊबंदांपैकी १७-१८ वर्षाच्या बाळामहाराज पंडित यांनाच दत्तक घ्यावे, असा त्यांचा अट्टाहास होता. आणि ताई महाराजांवर तर नागपूरकरांचा मोठाच प्रभाव होता. दत्तक विधानासाठी लोकमान्य औरंगाबादला गेले तरी नागपूरकर पुण्यालाच होते. लोकमान्य पुण्यात नाहीत म्हटल्यावर नागपूरकरांना रान मोकळे मिळाले.

दत्तक विधान पूर्ण झाल्यावर खाशी मंडळी पुण्याकडे परतली. सदाशिव पेठेतील आपल्या भाऊमहाराज वाड्यात ताई महाराज गेल्या आणि जगन्नाथाला घेवून लोकमान्य गायकवाड वाड्यात गेले. त्यामुळे ताई महाराज कटकारस्थान करणाऱ्या मंडळींच्या गराड्यात सापडल्या. त्या मंडळींनी ताईमहाराजांच्या मनावर आपले मत बिंबवले आणि जगन्नाथाला झिडकारून नव्याने दत्तक घेण्याविषयी भरीला पाडले.

ताई महाराज या काहीशा अविवेकी व कमकुवत मनाच्या होत्या. त्यांनी लोकमान्यांना डावलून नागपूरकरांचा पक्षच उचलून धरला. एवढेच नव्हे तर दुसरे दत्तक विधान करण्यास त्यांनी मान्यता दिली. तारीखही ठरली. पुण्याचे कलेक्टर मि. अस्टनसाहेब यांचीही त्या मंडळीना फूस होती. कारण त्यांना टिळकांन कुठेतरी गोवायचे होते. आणि इथेच ठिणगी उडाली.......

लोकमान्यांचे हेरखाते अत्यंत कार्यक्षम होते. त्यांच्याकरवी लोकमान्यांना वाड्यातील बित्तमबातमीचा सुगावा लागायचा. दत्तक विधान झाल्यावर १५ दिवस होतात न होतात तोच लोकमान्य कामाला लागले. विघ्नसंतोषी मंडळीचा डाव हाणून पडायचा, जगन्नाथाला संरक्षण द्यायचे आणि बाबामहाराजांच्या इस्टेटीचे जतन करायचे हा त्यामागे लोकमान्यांचा हेतू होता. थोडक्यात म्हणजे मरणसमयी बाबामहाराज पंडितांनी जी जबाबदारी सोपवली होती व जी लोकमान्यांनी स्वीकारली होती, तिचे प्रमुख ट्रस्टी या नात्याने पालन करायचे. ११, १२, व १३ जुलै या काळात लोकमान्यांवर अतिशय ताण पडला. त्या तीन दिवसांत गायकवाड वाड्यातून अनेक तारा व पत्रे बाहेर पडली. त्यानंतर सतत हे सत्र चालूच राहिले. त्यापैकी लोकमान्यांच्या हस्ताक्षरातील बऱ्याच स्थळप्रती माझ्याकडे आहेत. लोकमान्यांचे हस्ताक्षर किती वळणदार होते हे त्यावरून कळून येते.

त्यांचा अभ्यास करता असे लक्षात येते की ११ जुलै रोजी कोल्हापूरच्या सबनीस दिवाणांना लोकमान्यांनी तीन तारा केल्या, आणि त्याच दिवशी त्यांनी एक सविस्तर पत्रही पाठवले. या सर्व पत्र व्यवहारातील आशय असा होता, की इकडे जगन्नाथाला बाजूला सारून दुसरे दत्तक विधान करण्याचा घाट घातला जात आहे. ट्रस्टींच्या संमतीने औरंगाबादला दान प्रतिग्रह होवून दत्तक विधानाचा करार रजिस्टर झालेला आहे. त्यानुळे दुसऱ्या कोणास दत्तक घेतल्यास ते बेकायदेशीर ठरेल म्हणून दुसरे दत्तक विधान झाले तर आम्हाला कसून भांडावे लागेल.

लोकमान्यांची भाषा सडेतोड होती. प्रसंगी ते कसा आक्रमक पवित्रा घेत हेच यावरून दिसून येते. अशीच तंबी त्यांनी बाळामहाराज व पंडित महाराज यांनाही दिली होती. १२ जुलै रोजी सबनिसांच्या पत्रात लोकमान्य म्हणतात, “ट्रस्टी हे अतिशय निस्वार्थीपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. तरी एकदा कोल्हापूर सरकारने आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणतेही हुकुम करू नयेत. असे झाल्यास विनाकारण फिर्यादीअर्यादी होवून त्या भांडणापायीच सर्व इस्टेटीचा नाश होईल.”

ज्या दिवशी दत्तक विधान झाले त्याच दिवशी, म्हणजे २८ जून १९०१ रोजी ताई महाराजांनी जगन्नाथाच्या जनक वडिलांना – श्री. भाऊसाहेब देव निधोनेकरांना- खालीलप्रमाणे पत्र लिहून दिले होते –

“आपण आमच्या विनंतीस मान देवून आपला मधला मुलगा जगन्नाथ यास बाबा महाराजांचा वारस म्हणून आम्हास दत्तक दिलात, त्याचे आम्ही सर्व प्रकारे पुत्राप्रमाणे परिपालन करू, तोच खरा इस्टेटीचा अधिकारी आहे. त्याच्याशिवाय दुसरा दत्तक आम्ही घेणार नाही.”

असे लिहून दिल्यावरही ताई महाराज बदलल्या व दुसरा दत्तक घेण्यास प्रवृत्त झाल्या. त्यामुळे १२ जुलैच्या रात्री एक मोठा बाका प्रसंग उद्भवला...... १२ जुलैच्या रात्री बाळा महाराजांचा दत्तक विधी उरकून   घ्यायचा असे नागपूरकर व त्यांच्या मंडळींनी ठरवले होते. या निर्णयाची चाहूल रात्री ११ वाजेपर्यंत कोणालाच लागू दिलेली नव्हती. पण जसे ११ वाजत आले तशी गडबड सुरु झाली. उपाध्यायाला दत्तक विधीची तयारी करण्याची आज्ञा झाली. तो उपाध्याय मोठा हुशार होता. त्याने एक युक्ती केली. वाड्यात कडेकोट बंदोबस्त होता. कोणाला बाहेर जाऊ दिले जात नव्हते व कोणाला आत घेतले जात नव्हते. ‘दत्तक विधीची पोथी घरी विसरलीय, ती घेवून येतो.’ आसे सांगून त्याने घरी जाण्याची नागपूरकरांकडून परवानगी मिळवली. तो घरी न जाता तडक कारकुनाकडे गेला आणि १२ वाजता दत्तक विधी होणार असल्याची त्याने वर्दी दिली. कार्कूनही टिळकांच्याच बाजूचा होता, तितक्या रात्री झपझप पावले टाकत तो टिळकांकडे जाऊन पोचला. लोकमान्य बाळासाहेब नातुंकडे गेलेले होते. कारकुनाची स्वारी तिथे पोहचली. टिळकांन बातमी समजताच त्यांनी व नातूंनी ठरवले, कि लगोलग वाड्यात जायचे वआणि विघ्नसंतोषी मंडळींचा डाव हाणून पाडायचा, मग ते तिघे वाड्याकडे आले. वाडा बंद होता, आत येण्यास मनाई होती. पण कारकुनाने मोठ्या  हुशारीने ‘दत्तकाची पोथी घेवून आलोय, दार उघड.’ असे दर्वानाला फर्मावले. त्याबरोबर दिंडी दरवाजा उघडला गेला. टिळक आणि नातू कोपऱ्यावरच उभे होते. कारकुनाने एक पाय आत आणि दुसरा पाय दिंडी दरवाजा बाहेर ठेवून टाळी वाजवली. त्याबरोबर लोकमान्य आत घुसले. त्यांना पाहताच दरवान दचकला. लोकमान्य लगबगीने तडक आतल्या चौकात जाऊन उभे राहिले आणि आपल्या करड्या आवाजात त्यांनी नागपूरकरांना हाक मारली. “नागपूरकर!” त्यावेळी ते दत्तक विधानाची पूर्वतयारी करत होते. पण टिळकांच्या आकस्मिक आगमनामुळे दत्तक विधानाचा बेत आपोआपच रद्द झाला... या प्रसंगातून लोकमान्यांची धाडसी वृत्ती, त्वरित निर्णय घेण्याची शक्ती आणि कार्यतत्परताच दिसून येते.

याप्रकरणी लिहिलेल्या एका पत्रावर इंग्लिश मध्ये ‘बाळ गंगाधर टिळ’ अशी स्वाक्षरी आहे, तर काही परतात ‘बी.जी.टी.’ अशी अक्षरे आहेत. या सर्व पत्रातून लोकमान्यांच्या कडक व सौम्य अशा दोन्ही रूपांचे दर्शन घडते. बाबामहाराजान्न दिलेला शब्द पाळणे, आपल्या निर्णयाशी ठाम राहणे आणि कर्तव्याची जाणीव ठेवणे हे त्यांचे स्वभाव विशेषही उठून दिसतात. लंडनच्या प्रीव्ही कौन्सिलमध्ये १९१५ मध्ये अपिलाचा निकाल लागून जगन्नाथ महाराजांचे दत्तक विधानही शाबित झाले.त्यामुळे लोकमान्यांच्या कामात भरच पडली. आता सरकार दरबारी जगन्नाथ महाराजांचे नाव लावणे, जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंद करणे, कोर्ट ऑफ वार्डस ताब्यातील इस्टेट सोडवणे, यासाठी त्यंची धडपड सुरु झाली. यातला बराचसा पत्रव्यवहार स्वतः लोकमान्यांनीच केलेला आहे, स्थावर मिळकतीच्या सनदांवर अर्जदार म्हणून लोकमान्यांचेच नाव आहे, त्यापैकी बऱ्याच सनदा अजूनही माझ्याकडे आहेत.

लोकमान्यांनी अशा प्रकारे माझ्या वडिलांसाठी अपार कष्ट सोसले. पण ते सर्व आपुलकीने व कर्तव्यबुद्धीने! याचे कारण म्हणजे लोकमान्यांनी माझ्या वडिलांना आपला तिसरा मुलगाच मानले होते.

----------

लेखक - बाळ. ज. पंडीत
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. वैभव तुपे यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.