Sunday, December 17, 2017

नोबेल पारितोषिक

नोबेलचे मानकरी

आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल

आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल हे एक जागतिक कीर्ती लाभलेले संशोधक आहेत. ते स्विडिश गृहस्थ होते. आल्फ्रेड नोबेल यांचा २१ ऑक्टोबर १८३२ रोजी स्टॉकहोम येथे जन्म झाला होता. इमॅन्यूएल नोबेल व आंद्रिएता आल्सेल या पती-पत्नीचे आल्फ्रेड नोबेल हे तिसरे अपत्य. आल्फ्रेड यांचे सगळ्यात मोठे भाऊ रॉबर्ट. रॉबर्ट यांनी रशियात खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणावर कारखाना उभा केला होता. तर दोन नंबरचे लूटव्हिग यांनी सेंट पीटर्सबर्गला शस्त्रास्त्रांचा कारखाना काढला होता. वडील इमॅन्यूएल हे युद्ध साहित्याचे उत्पादन करीत असत. वडिलांचे आणि आल्फ्रेड यांचेही कोणत्याही प्रकारचे उच्चशिक्षण झालेले नव्हते. स्टॉकहोम मधील ‘सेंट याकोप्स हायर अॅपॉलॉजिस्ट स्कूल’ या शाळेत आल्फ्रेड यांचे वर्षभरच शिक्षण झाले. त्यानंतरचे

त्यांचे शिक्षण रशियन आणि स्विडिश शिक्षकांकडून घरीच झाले. मात्र अतिशय बुद्धिमान असलेल्या आल्फ्रेड यांच्या जवळ स्वयंशिक्षित असे ज्ञान आणि माहितीचे भंडार होते. त्यांना जर्मन, स्विडिश, इंग्रजी आणि रशियन भाषा चांगल्याप्रकारे येत होत्या. वडिलांना व्यवसायात बरेच नुकसान आले असता व्यवसाय पुन्हा उभा राहाण्यासाठी आल्फ्रेड यांनी त्यावेळेस वडिलांना चांगलीच साथ दिली. पुढे आर्थिक स्थिती सुधारल्यावर वडिलांनी शिक्षणासाठी आणि जगाचे ज्ञान होण्यासाठी आल्फ्रेड यांना परदेशी पाठविले. पुढील दोन वर्षे त्यांनी इटली, उत्तर अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स येथे दौरा केला. या अभ्यासदौऱ्यामुळे त्यांच्या ज्ञानात विविधांगानी भर पडली. तसेच पॅरिस येथे रसायनशास्त्राबद्दल त्यांनी बरेच ज्ञान मिळविले.

दोन वर्षांनंतर सेंट पीटर्सबर्गला परत आल्यावर आल्फ्रेड वडिलांच्या कारखान्यातच काम करू लागले. वडिलांबरोबर नायट्रोग्लिसरीन वर ते विविध प्रकाराने संशोधन करू लागले. आणि १८६२ मध्ये आल्फ्रेड यांनी नायट्रोग्लिसरीन संबंधातील पहिला स्फोट केला. त्यानंतर पार्कशन डिटोनेटरच्या शोधाचे पेटंट त्यांनी मिळविले. त्यानंतर स्वतंत्र कारखाना उभारला. पण त्यात स्फोट होऊन बरेच नुकसान झाले. त्यात त्यांच्या लहान भावाचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे वडील फारच खचले होते. मात्र आल्फ्रेड यांनी धीर न सोडता त्यांनी नायट्रोग्लिसरीन तयार करण्यासाठी दुसरी कंपनी काढली. हे करताना अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी आपला व्यापार अनेक देशांमध्ये विस्तारला. परंतु पूर्वी झालेल्या नायट्रोग्लिसरीन अपघातात आणि नायट्रोग्लिसरीनच्या साठ्याचे अनेकवेळा झालेले स्फोट लक्षात घेऊन आल्फ्रेड यांच्या कारखान्यांवर बंदी घालण्यात आली. ही अडचण लक्षात घेऊन आल्फ्रेड यांनी सुरक्षित स्फोटकांसाठी संशोधन सुरु केले आणि या संशोधनातूनच त्यांना जगप्रसिद्ध झालेल्या ‘डायनामाइट’चा शोध लागला.

कीझेलगूर आणि नायट्रोग्लिसरीन पासून डायनामाइट तयार करण्यात त्यांना यश आले होते. या सुरक्षित स्फोटक द्रव्यामुळे डायनामाइट प्रसिध्द झाले.  आल्फ्रेड यांचे डायनामाइट त्यामुळे जगभर पसरले. आल्फ्रेड यांचा व्यापार प्रचंड स्वरुपात वाढला. या शोधामुळे आल्फ्रेड यांना संशोधक म्हणून प्रसिद्धी मिळाली. तरी त्यावर आणखी प्रयोग करून त्यात नाविन्य आणण्याचे आल्फ्रेड यांचे प्रयोग सुरूच होते.

डायनामाइटचा शोध आल्फ्रेड नोबेल यांना लागला. तो जगभर पसरला. पण आल्फ्रेड तेवढ्या शोधावर समाधानी नव्हते. डायनामाइट मध्ये असणारे काही दोष काढून टाकून आणखी चांगल्या स्वरूपाचे स्फोटक बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यात त्यांना चांगले यश सुद्धा मिळत होते. वेगवेगळ्या स्फोटकांची निर्मिती होत होती. आणि आल्फ्रेड त्याचे एकस्व मिळवत ही होते. धूर रहित आणि अधिक शक्तिशाली स्फोटकांचा शोध लावताना स्फोट घडवून आणण्यासाठी उपयोगी असेल अशा डिटोनेटरचा शोध सुद्धा त्यांनी लावला. हा शोध महत्त्वाचा मानला जातो. स्फोटकांबरोबरच आल्फ्रेड नोबेल यांनी बायॉलॉजी, इलेक्ट्रोकेमेस्ट्री, फिजिऑलॉजी इत्यादी विषयातही संशोधन केले आहे. डायनामाइट, स्फोटके आणि स्फोटक जिलेटीन या आल्फ्रेड यांच्या शोधामुळे या क्षेत्रातील पुढील संशोधन करणाऱ्यांना त्याची मदत झाली. तसेच खाणकाम क्षेत्रात या विस्फोटकांचा खूपच उपयोग झाला. त्यांनी आपल्या शोधासंबंधी ३६० च्या जवळपास पेटंट मिळविली होती. या मिळालेल्या पेटंटच्या साह्याने आल्फ्रेड यांनी अनेक देशात कारखाने उभारले. या कारखान्यांना होणाऱ्या प्रचंड प्रमाणातील नफ्यातून त्यांनी गडगंज संपत्ती मिळविली. चांगल्या कामासाठी निर्माण केलेल्या स्फोटकांचा विध्वंसक दुरुपयोग होत असलेला पाहून मात्र ते दुःखी झाले. बहुतेक त्यामुळेच त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात आयुष्यभर जमविलेल्या प्रचंड संपत्तीचा विनियोग विधायक कार्यासाठी केला जावा असे नमुद केले. यातूनच नोबेल पारितोषिकाच्या कल्पनेचा जन्म झाला.

३६० च्या जवळपास स्वतःच्या संशोधनाचे पेटंट मिळवणारे थोर संशोधक आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या संशोधनाच्या द्वारे जगभरात अनेक कारखाने काढले. त्यातून भरपूर संपत्ती मिळविली. मागे अनेक व्याप वाढल्यामुळे १८८० ते १८९६ पर्यंत त्यांनी अनेक संकटे व कटकटी यांना तोंड दिले. लहानपणी प्रकृतीने नाजूक असणाऱ्या आल्फ्रेडला शेवटी तब्बेतीने बराच त्रास दिला. परंतु जिद्दीने सर्व सांभाळणाऱ्या नोबेल यांनी आपल्या मागे आपल्या सर्व संपत्तीचे नीट वितरण व्हावे म्हणून १८९५ मध्ये स्वतःचे मृत्यूपत्र लिहून ठेवले. १० डिसेंबर १८९६ रोजी सानरेमो, इटली येथे त्यांचे निधन झाले. १८९७ च्या जानेवारी मध्ये त्यांनी लिहिलेले मृत्यूपत्र जाहीर झाले. मृत्यूपत्राप्रमाणे त्यांच्या मालमत्तेतील मोठ्या हिस्स्यातून एक विश्वस्त निधी उभारण्यात येऊन त्या निधीद्वारे येणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी  जागतिक पातळीवर पाच पारितोषिक देण्यात यावी; असा त्यात उल्लेख होता.

ही पारितोषिक मानव जातीसाठी अत्युच्च असे विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात यावीत अशी त्यांची इच्छा होती. या त्यांच्या इच्छेवर जगभरात प्रतिक्रिया उमटल्या. मृत्यूपत्र खरे आहे की नाही इथपासून त्यासंबंधी अनेक वादविवाद झाले. या अडचणीतून बाहेर येऊन मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी नोबेल प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. त्याला सरकारची मान्यता मिळाली. पारितोषिकाबद्दल अनेक नियम व अटी ठरवून शेवटी वैद्यक, रसायनशास्त्र, भौतिक आणि साहित्य या चार पारितोषिकांचे हक्क स्वीडनकडे ठेवण्यात आले आणि पाचव्या शांततेच्या पुरस्काराचे हक्क नॉर्वे या देशाकडे ठेवण्यात येऊन आल्फ्रेड नोबेल यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी १९०१ मध्ये या पाच क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात झाली.

संकलन:-मंजिरी होनकळसे

टंकन:-अभिजित शिंदे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

नोबेल पारितोषिक

नोबेलचे मानकरी

रिचर्ड डिकिन्सन

वैद्यकशास्त्रातील १९५६ चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ

     मानवी जीवनात'हृदय'हा फार महत्त्वाचा अवयव आहे.अलीकडे फार मोठ्या प्रमाणावर हृदयविकाराचे झटके येऊन या विकाराने मृत्यू होत आहेत. अन्य स्नायूंप्रमाणे हृदयातील स्नायूंनाही सतत रक्तपुरवठा करावा लागतो. त्यात काही अडथळा निर्माण झाल्यास रक्तपुरवठा खंडीत होतो, हृदयाची क्रिया बंद होते व माणूस मृत्युमुखी पडतो.

रक्तपुरवठा कमी झाल्यास वा नियमित न झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या रक्तपुरवठ्याची क्रिया नीट होते आहे किंवा नाही हे आगाऊ समजू शकेल का??त्याचे निदान कारण समजू शकेल का?? याचा विचार रिचर्डस् डिकिन्सनच्या मनात येताच रुधिराभिसरणाच्या एकूण प्रक्रियेचे त्याने संशोधन सुरू केले. हे अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ होते.त्यांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता बाह्य रक्तवाहिन्यांतूनही त्याचा वेध घेता येतो. रोहिणी शुद्ध रक्तवाहिनी व नीला अशुद्ध रक्तवाहिनी. पायाच्या रक्तवाहिनीतून द्रवपदार्थ घेऊन जाणारी बारीक सूक्ष्मनलिका सरळ हृदयापर्यंत नेता येते व रुधिराभिसरणाचे कार्य लक्षात येऊ शकते. या संशोधनाबद्दल १९५६ चा नोबेल पुरस्कार फोर्समन व कोनार्ड यांच्याबरोबर त्यांना विभागून देण्यात आला.

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

  रोबेर्ट कॉख

वैद्यकशास्त्रातील १९०५ चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ

   रोबेर्ट कॉख यांचा जन्म १२ सप्टेंबर १८४३ रोजी क्लौस्थल्य या जर्मनमुक्त गावी झाला. या जर्मन शरीरशास्त्रज्ञ (फिजिशयन) व सूक्ष्म जंतूशास्त्रज्ञाने १८८२ साली क्षय रोगासारख्या संसर्गजन्य रोगाचे जंतू शोधून काढले.त्या सूक्ष्म जंतूंना प्रतिकार करणारी प्रतिबंधक औषधेही शोधून काढली. गॉन्टिजन युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करून १८६६ साली पदवी संपादन केली. १८७०-७१ फ्रान्स-प्रशिया युद्धात शस्त्रवैद्य म्हणून काम केले.

एंथ्रॅक्सवर संशोधन करून त्यांनी संरक्षक व सूक्ष्म जंतूंचे फोटोग्राफिक , सचित्र एका काचेवर पातळ सूक्ष्म जंतूंचे तरंग दाखवून त्यावर १८७७ साली प्रबंध लिहिला.साथीच्या रोगाचे सूक्ष्म जंतू वेगवेगळे संसर्गजन्य रोग पसरवतात; पण १०० वर्षांपूर्वी या जंतूंचे संशोधन करून ते कसे असतात ,कसे दिसतात हे शोधकार्य करणे फार कठीण होते ; कारण त्या काळात आजच्यासारखी सूक्ष्मदर्शक यंत्रही नव्हती. पण रोबेर्ट कॉख या जर्मन जंतूशास्त्रज्ञाने अगदी साधे सूक्ष्मदर्शक यंत्र वापरून कॉलरा , पटकी, एंथ्रॅक्स ( जनावरांचा एक रोग) यांचे सूक्ष्म रोगजंतू शोधून काढले व त्यांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. १९०५ सालचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना याच संशोधनाबाबत देण्यात आले.

संकलन :-  मंजिरी होनकळसे

टंकन  :-  वैशाली सरवणकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

नोबेल पारितोषिक

नोबेलचे मानकरी

यान टिनबर्जेन-  अर्थशास्त्रातील पहिले १९६९ सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थशास्त्रज्ञ.

अर्थशास्त्राचे नोबेल स्मृती पारितोषिक हे १९६९ सालापासून देण्यास सुरुवात झाली. अर्थशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक मिळविण्याचा पहिला मान नेदरलँड्सचे  यान टिनबर्जेन या अर्थतज्ञाला मिळाला.यान टिनबर्जेन यांचा जन्म १२ एप्रिल १९०३ रोजी झाला. डेरीक काँर्नेलिस टिनबर्जेन आणि जिनेट वँन   इक या पती-पत्नीच्या ५ अपत्यांमध्ये यान टिनबर्जेन हे सगळ्यात ज्येष्ठ आपत्य यांचा लहान भाऊ लहान निको यालाही १९७३ सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांचा आणखी एक भाऊ ल्यूक हा पक्षीतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे.यान टिनबर्जेन   लेडेन विद्यापीठात गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करीत होते. १९२९  मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून  पीएच. डी. ची पदवी मिळविली. त्यासाठी त्यांनी मिनिमायझेशन प्रोब्लेम इन  फिजिक्स अँन्ड इकोनोमिक्स' हा प्रबंध लिहिला. त्यानंतर इरास्मस् विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. १९२९ ते १९४५ पर्यंत ते विद्यापीठात होते.'लिग आँफ नेशन' या संघटनेचे ते सल्लागार होते.

१९४५ ते ५५ पर्यंत 'नेदरलँण्डस ब्युरो फाँर इकोनाँमिक्स पाँलिसी अँनालिसिस' याचे ते संचालक होते. याबरोबरच अर्थशास्त्रावरील त्यांचे संशोधन सुरूच होते. गणितीय   राशीच्या मदतीने आर्थिक घडामोडीचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे अर्थमिती होय.अशाप्रकारे आर्थिक  प्रक्रियांच्या विश्लेषणासाठी गतिमान प्रतिकृतीही त्यांनी तयार केल्या. च्या त्यांच्या या अर्थशास्त्रीय संशोधनाबद्दल १९६९ चे अर्थशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक त्यांना राग्रार अँटोन किटिल फ्रिश यांच्या बरोबर देण्यात आले.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

साहित्यातील १९१३ त्यांचे नोबेल पारितोषिक  प्राप्त साहित्यिक रवींद्रनाथ टागोर

प्रसिद्ध भारतीय कवी, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि देशभक्त म्हणून रवींद्रनाथ टागोरांना सन्मानाने गुरुदेव असे संबोधले जाते. रवींद्रनाथ टागोरांचा जन्म बंगालमध्ये झाला. रवींद्रनाथ टागोर हे त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षापासून कविता करत असत. त्यांचा पहिला कवितासंग्रह वयाच्या सोळाव्या वर्षी 'भानूसिंह' या टोपणनावाने प्रसिद्ध झाला १८७७ मध्ये त्यांनी काही लघुकथा आणि नाटकं लिहिली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिश सरकार विरुद्ध उघड उघड विचार माडंले. बंगाली कलांवर होणाऱ्या त्या काळातील ग्रीक आणि लॅटिन कलांच्या वर्चस्वावर त्यांनी कणखरपणे भूमिका घेऊन त्याला प्रतिकार केला होता. 'चित्रा' ' चैताली'' कल्पना' 'क्षणिका' आणि 'नैवेद्य' इत्यादी काव्यसंग्रह तर 'चित्रांगदा' 'मालिनी' ही नाटकं याशिवाय अनेक लघुकथा लेख  यांचा त्यांच्या साहित्यात समावेश आहे. 'गीतांजली' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून या काव्यसंग्रहा बद्दल त्यांना १९१३ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले.

हे नोबेल पारितोषिक फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील साहित्याचे पहिले नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले होते. त्यांचे बरेचसे साहित्य इंग्रजी भाषेत असल्यामुळे ते पाश्चात्य देशातही लोकप्रिय झाले. त्यामुळे भारतीय संस्कृतीतील अनेक चांगले विचार व संस्कार पाश्चात्त्या पर्यंत पोहोचले. त्यांची 'गोरा' ही कादंबरी खूप गाजली. 'जन गण मन' हे भारतीय राष्ट्रगीत आणि बांगलादेशाचे 'आमार सोनार बांगला' राष्ट्रगीत अशा दोन देशांच्या राष्ट्र राष्ट्रगीतांची  त्यांनी रचना केली आहे. या थोर भारतीय विचारवंत साहित्यिकाला १९१३ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

सर जोसेफ जॉन थॉम्पसन
भौतिकशास्त्रातील १९०६ चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ.

मॅंचेस्टरनजीक चँथमहिल येथे ११  डिसेंबर १८५६ रोजी जोसेफचा जन्म झाला. मॅंचेस्टर येथील एका पुस्तकविक्रेत्याच्या घरात जन्म घेतलेल्या या बुद्धिमान मुलाने चौदाव्या वर्षी ओवेन कॉलेजात प्रवेश मिळवला. ओवेन कॉलेजात भौतिकशास्त्रातील प्रायोगिक रसायन शाळा ही विशेष सोय उपलब्ध होती.१८७६ साली त्याने ट्रिनिटी कॉलेजची शिष्यवृत्ती मिळवली. बीएची पदवी घेतली.१८८० साली गणित विषयात त्याने प्रावीण्य संपादन केले. त्यात संशोधनाचा भाग अधिक होता. १८८४ सालच्या रॉयल सोसायटीच्या सदस्यत्व निवडीमुळे थॉम्पसन लोकांच्या नजरेत भरला. कँडनेव्हियन लॅबोरेटरीमध्ये संशोधनासाठी त्याला नियुक्त करण्यात आले. विद्युत शास्त्रातील त्याचे शोध फार महत्त्वाचे ठरले. अनुसंरचनेचे सूक्ष्म अध्ययन करून अनु किरणांचे समत्व शोधून काढून अनेक रेणूंची गुणवत्ता शोधून प्रकाश किरणांचे गुणधर्म व त्यांची कार्यशक्ती यांच्या संशोधनामुळे बरीच इलेक्ट्रॉनिक आयुधे अस्तित्वात येऊ शकली. इलेक्ट्रॉनचे महत्त्व लक्षात येण्यास थॉम्पसनचे  हे संशोधन फारच उपयुक्त ठरले. वायूंच्या विद्युतीय संवाहकतेविषयी उच्च गुणवत्तेचे सैद्धांतिक व प्रायोगिक अनुसंधान केल्याबद्दल त्यांना १९०६ चे भौतिकी नोबेल पारितोषिक देण्यात आले.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

विल्हेल्म राँटजेन
भौतिकीतील 1901 चे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ.

क्ष किरणांचा शोध लावणारे जर्मन शास्त्रज्ञ विल्हेल्म राँटजेन हे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले शास्त्रज्ञ होय.२७ मार्च १८४५ रोजी लेन्नप (प्रशिया) येथे त्यांचा जन्म झाला.राँटजेन यांचे शिक्षण झुरिच येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर ते वुर्झबर्ग  भौतिकशास्त्राचे  प्राध्यापक काम करीत होते. स्ट्रॉसबर्ग युनिव्हर्सिटीतही त्यांनी अध्यापनाचे काम केले. हे काम करीत असतानाच संशोधनाकडे त्यांचा अधिक कल होता. त्यासाठी त्यांनी फिजिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. १८९५ मध्ये वायूमधून विद्युत प्रवाह सोडण्याचे ते प्रयोग करीत होते. हा प्रयोग करीत असताना निर्वात काच धक्का बसला. त्यामुळे त्यांची जिज्ञासा वृत्ती अधिकच जागृत झाली. त्यावेळी बेरियन प्लॅन्टिनोसानायडच्या तुकड्यातून प्रकाश बाहेर आला. तेव्हा त्यांनी त्याचा सखोल विचार करून त्याचे तत्व शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नलिकेवर कार्डबोर्डचे आवरण बसवलं व विद्युत प्रवाह सुरू करताच जवळच असलेल्या कागदाची चमक वाढली त्याचं कारण कॅथोड किरण असल्याचं त्यांनी शोधून काढलं. इलेक्ट्रॉन ज्यावेळेला काच नळीवर आढळतात तेव्हा काही अज्ञात किरणांचे उत्सर्जन होते व ते खोलीत पसरतात. रासायनिक बदल होतो व तेच किरण शोषण प्रक्षेपणास कारणीभूत होतात हा किरणोत्सर्गाचा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरला. या शोधावर त्यांनी प्रबंधही लिहिला त्यांनी शोधलेल्या या कार्याला राँटजेन रेडीएशन असे नाव देण्यात आले. त्यांनी शोधलेले हे किरण म्हणजेच क्ष किरण. क्ष किरणांचा शोध मानवी शरीराच्या दृष्टीने वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यांच्या या संपूर्ण मानव जातीला उपकारक ठरणाऱ्या संशोधन कार्याबद्दल १९०१ मध्ये पदार्थविज्ञान शास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

फ्रेदरिक पासी
शांततेचे १९०१ सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त सामाजिक कार्यकर्ते-

फ्रेदरिक पासी हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. वीस मे १८२२ रोजी पॅरिस येथे त्यांचा जन्म झाला पासीचे काका हे केंद्रीय मंत्री होते. त्यामुळे घरात समाजकारणाचे वातावरण होते. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पासीने कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर स्टेट कौन्सिल मध्ये ते अकाउंटंट पदावर रुजू झाले. त्यानंतर मात्र त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात प्रवेश घेतला. ही परीक्षा पास झाल्यावर १८५७ पासून ते व्यवसायिक अर्थतज्ज्ञ म्हणून काम करू लागले. विद्यापीठात असताना अर्थशास्त्रावर त्यांनी लिहिलेले निबंध  आणिअर्थशास्त्रावर दिलेली व्याख्याने बरीच गाजली ती प्रकाशित सुद्धा झाली.१८७७ मध्ये 'फ्रेंच अकॅडमिक देस सायन्स मॉरल्स एट पाँलिटिक्स' या संस्थेचे ते सभासद झाले. १८८१ साली 'चेम्बर ऑफ  डेप्युटीज' ची निवडणूक त्यांनी जिंकली. तेथे बदलणाऱ्या राजकीय प्रवाहांच्या संदर्भात ते वकिली सल्ला देत असत. तसेच कारखान्यातील अपघातांच्या संदर्भात   कामगारांच्या प्रश्नांना योग्य सल्ला ते देत असत. सामाजिक कार्यात  त्यांना विशेष रस होता. आंतरराष्ट्रीय लवादाचे ते पुरस्करते होते. क्रिमियन युद्धाच्या वेळी त्यांनी सुरू केलेले शांतता विषयक कार्य अखेरपर्यंत सुरू ठेवलेले होते. लीग इंटरनॅशनल द ला पैक्स ही संस्था त्यांनी स्थापन केली. आंतरराष्ट्रीय संसदीय संघ स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. पासी हे अर्थशास्त्रज्ञ मुत्सद्दी आणि शांततावादी होते. त्यांनी केलेल्या सकारात्मक समाज कार्यासाठी त्यांना १९०१ चे शांततेचे नोबेल पारितोषिक द्यूनाट यांच्यासोबत  विभागून देण्यात आले.

संकलन:-मंजिरी होनकळसे

टंकन:-सुषमा कासार

#ज्ञानभाषामराठी
#माझीशाळामाझीभाषा

Thursday, December 14, 2017

नोबेल पारितोषिक

पाउल योहान लुटव्हिग फोन हायझे

साहित्यातील १९१० सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ
----------------------------------------
हायझे हे एक प्रसिद्ध जर्मन साहित्यिक होते. हायझे यांचा जन्म १५ मार्च १८३० रोजी जर्मन बर्लिन या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करी विल्हेम लूटव्हिग हायझे तर आईचे नाव जुली सलिंग होते. हायझे यांचे वडील करी विल्यम हायझे हे एक प्रसिद्ध भाषा शास्त्रज्ञ होते. तर आई ही जेविश कुटुंबातील होती. जेविश हे कुटुंब अतिशय श्रीमंत होते. पाउल योहान हायझे यांचे शिक्षण बर्लिन आणि बोन येथे झाले. दर्जेदार भाषांचे ज्ञान त्यांनी आपल्या शिक्षणातून मिळविले होते. त्या नंतर हायझे यांनी अनेक इटालियन कवितांचे भाषांतर केले. तसेच त्यांनी बऱ्याच लघुकथा लिहिल्या ज्या जगप्रसिद्ध झाल्या. विविध विषयांवर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. १८७३ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक ‘चिल्ड्रेन ऑफ दि वर्ल्ड” हे फार गाजले. बर्लिनच्या पोयेट सोसायटीचे ते सभासद होते. तसेच परंपरावादी म्युनिच स्कूलचेही ते सभासद होते. कवितांच्या बरोबरीने त्यांनी नाटकं लिहिली त्यांची संख्या ६० च्या वर आहे. आपल्या लेखन शैली मुळे ते लोकप्रिय साहित्यिक झाले. त्यांचे साहित्य हे आदर्श वादावर आधारित होते. तसेच ते कलात्मक आणि परिपूर्ण होते. त्यांच्या लेखणीत नाविन्य असे. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेचा स्पर्श लाभलेल्या लघुकथा फार गाजल्या. अशा या कादंबरीकार, नाटककार, भावकवी, भाषा तज्ञ, लघुकथाकार असलेल्या हायझे यांना १९१० सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले होते.

संकलन:-मंजिरी होनकळसे

टंकन:-वैभव तुपे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा