Friday, September 1, 2017

ओळख तिकिटांची


पहिले पोस्टाचे तिकीट

तिकीट लावून पाठवण्याची व्यवस्था सुरु झाली .तेव्हा जगातले पहिले तिकीट इंग्लंडमध्ये'पेनी ब्लॅक' नावाने 6 मे 1840 रोजी प्रचारात आले. तर भारतात इंग्रजी राजवट असतांना सिंध प्रांताचे कमिशनर मि. वार्टल परियर यांनी सिंध प्रांतापुरते 'सिंध डॉक्स' नावाने पहिले तिकीट 1852 मध्ये काढले. हे केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातले पहिले तिकीट ठरले. पहिले अखिल भारतीय तिकीट 1854 मध्ये अर्ध्या आण्याचे निळ्या रंगाचे तिकीट छापण्यात आले. त्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र होते. त्यानंतर 1 आणा, 2 आणे व 4 आण्यांची तिकिटे छापण्यात आली.

प्राचीन संदेश वाहक

जगभरात पूर्वीपासून टपाल  व्यवस्था अस्तित्वात होती. पोस्ट खाते जरी त्यावेळेस नव्हते तरी संदेश पोहचवणारे राजे महाराजे यांचे दूत होतेच. प्रसिद्ध महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या काव्यात शकुंतला दुष्यंन्त राजाला पत्र लिहितानाचे वर्णन आलेले आहे. तेच दृश्य पोस्ट खात्याने 1960 साली  काढलेल्या एका तिकिटात दर्शवले आहे. तसेच कालिदासाच्या मेघदूत काव्यात ढगांद्वारे यक्षाने आपल्या प्रेयसीस संदेश पाठविला असे वर्णन आहे. हे वर्णन चित्ररुप करून असे दृश्य असणाऱ्या तिकिटाचे प्रकाशन करून श्रेष्ठ कवी कालिदास यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध कवी तिरुवेलूवर आणि सुब्रमण्यमभारती यांची यावर्षी दोन तिकीटे प्रकाशित केली गेली

रेडक्रॉस, बालदिन, विद्यापीठ

1957 मध्ये झालेल्या 19 व्या आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संमेलननिमित्त रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांचे छायाचित्र असलेले तिकीट काढण्यात आले.  1957 सालापासून भारताचे पहिलेे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बाल दिन म्हणून सर्व भारतभर साजरा करण्यात येऊ लागला. या बाल दिनाच्या निमित्ताने 8 पैसे किमतीचे तिकीट  हस्तकला या विषयावर आधारित अशी तीन तिकिटे काढण्यात आली. भारतीय लोखंड उद्योग शताब्दी निमित्त 15 पैशांचे तिकीट काढण्यात आले. मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठाच्या चित्राची तिकिटे प्रकाशित करण्यात आली. पुढे दर वर्षी ह्याच तारखेला विविध प्रकारची तिकिटे तिकिटे प्रकाशित केली गेली.

पहिली विमान टपाल सेवा

जगप्रसिध्द इंजिनीयर सर डॉ.एम विश्वेश्वरय्या यांची जन्म शताब्दी 1960 साली साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. युनिसेफच्या बालक दिन फंडाच्या निमित्ताने 15 पैसे किमतीचे तिकीट प्रकाशित केले गेले. त्यावर आनंदित झालेली लहान मुले दर्शविण्यात आली आहेत. 1911 साली पहिल्यांदा विमानाने टपाल पाठविण्याची सुरुवात झाली होती. अलाहाबाद ते नैनी ह्या मार्गावर हि सेवा सुरु करण्यात आली होती. ही सेवा सुरू होऊन 1961 साली पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने एकंदर तीन तिकिटांचा संच काढण्यात आला. 5 पैसे, 15 पैसे आणि 1 रुपया किमतीची हि तिकिटे होती.  त्यावर एअर इंडिया बोईंग 707, जेट लायनर इत्यादी विमाने दर्शवली होती.

संकलन:-मंजिरी होनकळसे

टंकन:-अभिलाषा शिंपी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग

देशातून इंग्रजी घालवावी काय?

देशातून इंग्रजी घालवावी काय? 

लेखक : डॉ. जि. आ. नाईक

'बहार' पुरवणी, दैनिक पुढारी, दि. १ एप्रिल १९९०

-------------------
ब्रिटिशांचे राज्य जाऊन बेचाळीस वर्ष झाली पण इंग्रजी भाषा मात्र आपल्या देशातून काही गेली नाही. याचे कारण आमच्या देशस्तील बहुभाषिकता वा विशालता हे नव्हे, तर आपल्या समाजात, देशात स्वतःचे वर्चस्व गाजवून राहण्याची आपली प्रवृत्तीच नाही, हे आहे. गेल्या कित्येक शतकात आम्ही आमच्या अशा भाषेची जोपासनाच केलेली नाही.
इतर देशात त्यांच्या त्यांच्या भाषेबाबत सावधगिरी बाळगली जाते व भाषांचा विकास करण्यात येतो याचे विवेचन या लेखात केले असून आपण भारतीय मात्र वर्षानुवर्षे इंग्रजी भाषेच्या कुबड्या घेऊन आपले व्यवहार करीत आहोत याची खंतही या लेखकाने या लेखात व्यक्त केली आहे. 'देशातून इंग्रजी घालवावी काय?' हा प्रश्नही त्यांनी आपल्यासमोर मांडला आहे.
--
राजीव गांधींच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत देशात इंग्रजीचे स्तोम भरमसाठ माजलेले आहे. पंतप्रधान जाहीर सभेत सुद्धा इंग्रजीतून सर्रास भाषण करत होते. दूरदर्शनवर तर इंग्रजीचे साम्राज्यच स्थापन झाले होते. दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या सकाळच्या कार्यक्रमात तर कार्यक्रम चालवणारे अर्धे वाक्य इंग्रजीत आणि अर्धे वाक्य हिंदीत बोलून तो कार्यक्रम आजतागायत ते चालवीत आहेत. पण या देशात ९५ टक्के लोकांना आजही इंग्रजी कळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी या देशात आम्हाला इंग्रजी पाहिजेच काय, किती दिवस त्याचे स्तोम माजवीत राहायचे याचा आता विचार व्हायला हवा. कुसुमाग्रजांनी जागतिक मराठी परिषदेच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात ज प्रश्नाला हात घातलेलाच आहे. आता आम्ही , तुम्ही सगळ्यांनीच याचा विचार करायला हवा.

नव्या जनता दलाच्या भाजप-साम्यवादी यांच्या पाठींब्याने चाललेल्या विरोधी पक्षाच्या सरकारचे इंग्रजी बाबतच धोरण काय असावं की काँग्रेसच्या चाकोरीतून या विरोधकांच्या सरकारनेही याबाबत आपली वाटचाल करावी? याबाबतचे धोरण ठरवण्यासाठी इंग्रजी खरोखरच आंतरराष्ट्रीय भाषा आहे काय, तिचा वापर कोणते देश करतात, हे जाणून घेणे आवश्यक आहे. किती देशात इंग्रजी बोलली जाते कुठे कुठे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते , राजकीय आणि अर्थव्यवहार केला जातो हे जाणणे फायद्याचे ठरेल. बहुतेक भरतीयांच्यात अशीही एक समजूत स्थिर होऊन बसलेली आहे की इंग्रजी बोलणाऱ्या भारतीयाला परदेशात मानाचे स्थान मिळवणे सोपे जाते. या सर्व बाबतीत वस्तुस्थिती काय आहे?

युरोपात

मी काही वर्षे परदेशात इंग्रजी न बोलल्या जाणाऱ्या देशात (रशियात) वास्तव्य केले. या ना त्यानिमित्ताने बऱ्याच वेळेला पूर्व आणि पश्चिम सिंगापूर, हॉंगकॉंग आणि देशातही जाण्याचा मला योग आला होता. रशियात सगळीकडे भ्रमंती केली. ज सगळ्या प्रवासात इंग्रजीचे जगात स्थान आहे हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायची आणि कानानी ऐकायची संधी मिळाली, या अनुभवातून मला काय दिसले?
पश्चिम युरोपमध्ये २० देश आहेत, पूर्व युरोपात ८, या २८ युरोपियन देशात सर्वसामान्य जीवनात इंग्रजीचा वापर किती देशात केला जातो? इंग्रजी माध्यमातून किती देशात शिक्षण दिले जाते?

इंग्लंडच्या स्वतःच्या खंडात इंग्रजी भाषेचा वापर फक्त एकाच देशात केला जातो, तो देश म्हणजे इंग्लंड! इतर कुठल्याही युरोपीय देशात कुठल्याही शाखेतले  शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जात नाही. इतर कुठल्याही देशाचा राज्यकारभार वा न्यायदानपद्धती ही इंग्रजी भाषेतून चालवली जात नाही. पूर्व प्राथमिक शाळेपासून ते पी. एचडी. पर्यंतचे सर्व तऱ्हेचे शिक्षण प्रत्येक युरोपियन देश स्वतःच्या भाषेतूनच देतो.

हे देश किती मोठे आहेत? यांची स्वतःची भाषा म्हणजे कोणती भाषा? पश्चिम युरोप मधल्या २० देशांपैकी १५ देश इतके लहान आहेत की त्यांची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आहे. या सर्व देशातून विज्ञान, वास्तुकला, आयुर्विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आदी सेवा क्षेत्रातील सर्व शिक्षण फक्त त्यांच्याच मातृभाषेतून दिले जाते. कुठल्याही परकीय भाषेचा शिक्षणाचे माध्यम म्हणून कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही युरोपीय देशाने अद्याप वापर केलेला नाही.

याचा अर्थ प्रत्येक  देशाची वेगळी भाषा आहे असा आहे का? तसे नाही. जर्मन आणि फ्रेंच भाषा युरोपमध्ये बऱ्याच देशात लोक मातृभाषा म्हणून वापरतात. जर्मन आणि फ्रेंच युरोपमध्ये सगळीकडे गेले, स्थायिक झाले, आणि असे बरेच युरोपियन देश बनले. युरोपमधल्या बऱ्याच देशात दोन किंवा तीन मातृभाषा असणारे लोक मोठ्या संख्येत आहेत. या सगळ्या देशांच्या राष्ट्रभाषा शिक्षणाचे माध्यम या सर्व भाषेतून चालते. कुठलीही फक्त एक भाषा, मग ती कितीही प्रगत असो, युरोपमध्ये कोणत्याही देशात इतर भाषिकांच्यावर लादली गेलेली नाही. युरोपमध्ये फ्रेंच भाषा बोलणारे लोक फ्रान्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड आणि लुकझेंबर्ग या देशात राहतात. या चारही देशात ती राष्ट्रभाषा, मातृभाषा आणि सर्व व्यवहारांची भाषा म्हणून राहिली आणि वाढली. जर्मन भाषा बोलणाऱ्या लोकांची युरोपमध्ये पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि लुकझेंबर्ग असे पाच देश आहेत. तिथे जर्मन भाषिक लोकांची सर्व व्यवहारासाठी जर्मन हीच भाषा आहे. स्वित्झर्लंडमध्ये ३ राष्ट्रभाषा जर्मन, फ्रेंच आणि इटालियन आहेत. इवल्याशा लुकझेंबर्ग मध्ये जर्मन आणि फ्रेंच या तीन राष्ट्रभाषा आहेत. एकापेक्षा अधिक राष्ट्रात व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषा. या अर्थाने पहायचे असेल तर युरोपमध्ये फ्रेंच, जर्मन आणि इटालियन या तीनच आंतरराष्ट्रीय भाषा आहेत. इंग्रजी नाही. ती इंग्लंडबाहेर कुठेही वापरली जात नाही. जर्मन फ्रेंच व्यतिरिक्त स्वतःच्या भाषा वापरणारे इतर १२ लहानमोठे देश पश्चिम युरोपमध्ये आहेत.

युरोप सोडला की दुसरा महत्वाचा खंड म्हणजे अमेरिका. अमेरिका खंड दक्षिण आणि उत्तर भागात विभागला गेलेला आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत ११ प्रमुख देश आहेत. त्यापैकी फक्त इंग्रजी भाषिक असणारे देश किती? फक्त आणि तो म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका. कॅनडाच्या दोन राष्ट्रभाषा आहेत. इंग्रजी आणि फ्रेंच. इतर कुठल्याही नऊ देशात इंग्रजी अमेरिका खंडात चालत नाही. ब्राझीलमध्ये पोर्तुगीज भाषा आहे.  इतर सर्व ठिकाणी स्पॅनिश. अमेरिका खंडात स्पॅनिश ही बहुदेशात चालणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे, इंग्रजी नव्हे.

आशियात काय परिस्थिती आहे? परमुलखात सर्व तऱ्हेच्या व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी ही फक्त आशिया आणि आफ्रिकेतच काही देशात स्वीकारली गेली आहे. आणि ती फक्त गुलामगिरीच्या पार्श्वभूमीमुळे. इंग्रजी फक्त हिंदुस्तान, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, सिंगापूर, फिलिपाईन्स आणि हाँगकाँग या सहा देशातच शिक्षण आणि प्रशासनाचे माध्यम म्हणून वापरली जाते. इतर कुठेही नाही. जपानमध्ये लोकांना इंग्रजी कळत नाही. चीनमधील तिच परिस्थिती. मला आश्चर्य वाटते ते हाँगकाँगचे! या शहरावर इंग्रजी लोक शंभर वर्षे राज्य करताहेत पण इथे सुद्धा बहुसंख्य चिनी लोकांना इंग्रजी कळत तर नसावी किंवा इंग्रजीतून ते तुमच्याशी व्यवहार करायला साफ नाकारत तरी असावेत. प्रवासी म्हणून असा अनुभव मला फ्रान्सनंतर फक्त हाँगकाँगमध्येच आला.

पाश्चात्य जगतातून आपण जेव्हा साम्यवादी जगात प्रवेश करतो तेंव्हा परिस्थिती काही फारशी वेगळी दिसत नाही. पूर्व युरोपमध्ये मी जिथे जिथे फिरलो- रशिया व्यतिरिक्त पोलंड, पू. जर्मनी- तिथे तिथे इंग्रजीच्या कुबड्यांचा प्रवासी म्हणून सुद्धा मला कसलाही उपयोग झाला नाही. पूर्व युरोपमध्ये सगळ्या देशात बहुसंख्य लोकांना रशियन भाषा कळते आणि रशियन भाषेचाच इथे उपयोग होतो.

लोकांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात आणि बाहेर बऱ्याच भारतीयांची अशी समजूत झालेली दिसते की तुम्हाला इंग्रजी चांगल्यापैकी आले की बाहेर तुम्हाला व्यवहार तर करता येतोच, पण मान मिळतो. वस्तुस्थिती काय आहे? इंग्रजीचे कुबडे घेऊन वावरणाऱ्या भरतीयांबाबत इतरांचे अशा लोकांबद्दल काय मत आहे हे जाणण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि इंग्रजी भाषिक देशाबाहेर राहायची संधी मिळायला हवी. जग इंग्लंड अमेरिकेपेक्षा खूपच मोठे आहे. दुर्दैवाने भारतीयांना याची फारशी जाणीव नाही. हे जाणायचे असेल तर तुम्हाला रशियात काही दिवस तर रहायला हवे. फ्रान्समध्ये रहायला हवे, जपान, इटली, जर्मनीत राहायला हवे. दोन भारतीय जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा ते इंग्रजीत बोलतात. अशा इंग्रजी बोलणाऱ्या भारतीयांबाबत रशियात सर्व स्तरात अत्यंत तिरस्काराची भावना मला दिसली. हीच परिस्थिती फ्रान्स, जपान व जर्मनीत आढळली. माझे काही जवळचे जपानी, जर्मन मित्र आहेत. त्या कुणालाही आम्ही इंग्रजी बोललेले आवडत नाही. त्यांची भाषा शिका आणि बोला असे त्यांचे चुकूनही म्हणणं नाही. त्यांना फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की तुमच्या देशात तुम्ही तुमचीच भाषा का बोलत नाही, तुमचीच संस्कृती का वाढवत नाही? बऱ्याच वेळेला मी इंग्लंडला गेलो, निरनिराळ्या व्यवसायाच्या स्थरातल्या गोऱ्यांच्यात मला वावरायची संधी मिळाली. एकाही गोऱ्या इंग्रजाला आमच्या इंग्रजीचं कौतुक वाटल्याचं मला आढळून आलं नाही. लंडन मध्ये बरेच वेस्ट इंडिज मधून आलेले आफ्रिकी आणि भारतीय उपखंडातून गेलेले हिंदुस्तानी पाकिस्तानी स्थायिक झालेले आहेत. आफ्रिकी माणसांना जशी स्वतःची भाषा आणि संस्कृती नाही तशीच भारतीयांनाही नाही अशीच बहुतेक सगळ्या इंग्रजांची समजूत झालेली असावी असे मला दिसले.

गुलामगिरी

भारताची अशी परिस्थिती का झालेली आहे? काही वर्षे इंग्रजांनी राज्य केले म्हणून? जगात अशी फारच थोडी राष्ट्रे आणि संस्कृती असेल की जिथे काही वर्षे तर परकीयांनी राजू केले नाही. रशीयावर मागासलेल्या मंगोलांचे राज्य होते, फ्रान्सवर जर्मनीचे राज्य होते, अर्थात जर्मनी अद्यापही रशियन वर्चस्वाखाली आहे. जपानवर अमेरिकेने राज्य केले, चीनवर जपान्यांनी. पण या सगळ्या लोकांनी गुलाम गिरीचे आपले संस्कार केंव्हाच दूर केले आणि स्वतःची संस्कृती, इतिहास, भाषा, वाङ्मय या सगळ्यांनीच वाढवली आणि हे सर्व ज्या लोकांनी केले त्यांची राष्ट्रेही वाढली. खुद्द इंग्लंडची परिस्थिती तरी याबाबत काय होती? जितकी वर्षे इंग्रजांनी दुसऱ्यांवर राज्य केले त्यापेक्षा कितीतरी वर्षे अधिक दुसऱ्यांनी इंग्रजांवर राज्य केले आहे. 'ब्रिटन अन ऑफिशियल हँडबुक' या नावाचे दरवर्षी ब्रिफिश सरकार तर्फे एक पुस्तक प्रसिद्ध केले जाते. त्या त्या वर्षात इंग्लंड मध्ये काय काय घडले याबाबत त्या पुस्तकात माहिती असते. १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकातली ही माहिती पहा. रोमन लोकांनी इंग्रजांच्यावर २०० ते ३०० वर्षे राज्य केलेले आहे. डॅनिश राजांनी १०१७ ते १०४२ पर्यंत इथे राज्य केले. फ्रेंचांनी जवळ जवळ ३०० वर्षे राज्य केले. या तीन शतकात खुद्द इंग्लंडची राजभाषा, शिक्षण, संस्कृतीचे माध्यम फ्रेंच भाषा होती. जर इंग्रज, जर्मन, रशियन या सगळ्यांनी फ्रेंच भाषेचे आणि संस्कृतीचे वर्चस्व झुगारून देऊन आपापल्या भाषा आणि संस्कृती वाढवल्या तर ही असली गोष्ट भारतातच का होऊ शकत नाही?
हे असे होऊ शकत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे आमची बहुभाषिकता वा विशालता हे नसून स्वतःच्या समाजात, देशात स्वतःचे वर्चस्व चालवून राहण्याच्या सवयीचा इथला अभाव. आम्ही आमच्यावर खऱ्या अर्थाने गेल्या कित्येक शतकात राज्य केलेच नाही. आमच्या संस्कृतीची जोपासना केलीच नाही. इथे परकीयांचे लाड नेहमीच पुरवलेले गेलेले आहेत. बहुभाषिकता हे एक वरवरचे कारण. इवल्याश्या स्वीत्झर्लंड मध्ये जर तीन भाषा राज्यभाषा म्हणून वावरू शकत असतील ते भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये फक्त हिंदीचाच आग्रह काय म्हणून? हिंदीबरोबर दक्षिणेतली एक आणि पूर्वेतली एक (बंगाल, आसाम, ओरिसा) अशा तीन आंतरराज्यीय संपर्काच्या भाषा इथे चालू शकणार नाहीत? इतर सर्व व्यवहारात - शिक्षण, प्रशासन आदी क्षेत्रात इतर सर्व प्रांतात स्वभाषेतच व्यवहार होऊ शकणार नाही? हे सर्व होऊ शकते. फक्त करणाराच हवा. या देशाचे दुर्दैव हे की आमच्याच देशात आमचेच वर्चस्व गाजवू शकू असे गुण आमच्या संस्कृतीत आम्ही जोपासलेच नाही, मग इथून इंग्रजी जाणार कशी?

टंकन:-वैभव तुपे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग

प्राणी जग!!

हत्ती
मराठी नाव :हत्ती
इंग्रजी नाव :Elephant
शास्त्रीय नाव : Loxodonta
हिंदी नाव :हाथी
 
महिती:  सुपासारखे मोठे कान असणाऱ्या हत्ती या अजस्र प्राण्याच्या पृथ्वीवर फक्त दोनच जाती आहेत-
१. भारतीय हत्ती २. आफ्रिकन हत्ती
        यात आफ्रिकन हत्ती हा सर्वात मोठा असून त्याची उंचावू ११ १/२ फूट व वजन सहा टनांपर्यंत असते. हत्तीचे मदमस्त शरीर, त्यात लहान किलबिले डोळे, लहान मान, सुपासारखे मोठमोठे कान व खांबासारखे पाय ज्यावर हत्तींचे महाकाय वजन पेलले जाते. त्यामानाने त्याची शेपटी अतिशय लहान असते. जबड्यात दिन मोठे सुळे असून ते त्यांच्या संरक्षणार्थ कामी येतात. याच हस्तिदंतीसाठी हत्तीची शिकार केली जाते. तोंडाच्या खालच्या व वरच्या जबड्याजवळून नाकाच्या भागाची मोठी मांसल सोंड ४ ते६ फूट असून तिच्या टोकास नाकाची दिन छिद्रे असतात. सोंड हे हत्तीचे नाक आहे व या सोंडेचा उपयोग अन्न, झाडांच्या उंच फांद्यांवरील चारा खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, पाणी व धूळ अंगावर फवारण्यासाठी, अवजड लाकडांचे ओंडके उचलण्यासाठी व वास घेण्यासाठी होतो. हत्तीच्या सोंडेत मोठी ताकद असते.
         आफ्रिकन हत्तीत नर व मादी या दोघांनाही लांब-लांब सुळे  असतात. भारतीय हत्तीत फक्त नरालाच मोठे सुळे असतात. भारतीय हत्तीच्या पायाला चार बोटे असतात, तर आफ्रिकन हत्तीच्या पायाला फक्त तीनच बोटे आसतात. हत्तींना स्मरणशक्तीदेखील चांगली असते.  हत्तीची कातडी गेंड्यासारखी  जाड असते व जेव्हा जेव्हा ती कोरडी पडते, तेव्हा ते पाण्यात जावून सोंडेने त्यावर पाण्याची फवारणी करतात. याप्रकारे हत्ती त्यांची त्वचा कोरडी व स्वच्छ ठेवतात.
        मादी हत्तीचा गर्भारकाळ सर्व प्राणिमात्रांपेक्षा जास्त असून तो २० महिने असतो. हत्तीच्या पिलाचे वजन २०० ते ३०० पौंड तर उंची ३ फूट असते. हत्तीचे आयुष्यमान ६५ ते ७० वर्षाचे आहे. हत्तीचे अन्न पूर्ण शाकाहारी असून गवत, झाडाच्या फांद्यांवरील पाने, वेगवेगळी फळे हे होय. पर्यावरणाच्या दृष्टीने हे अजस्त्र जनावर अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्या हिरवा चारा खाण्याने झाडास नवीन पालवी फुटते व वृक्षांची वाढ होते.

=================================================

सांबर
मराठी नाव :सांबर,  ढाक
इंग्रजी नाव : Sambar
शास्त्रीय नाव :Cerve Unicolor
हिंदी नाव :सांबर, सामर

माहिती:   भारतातील सर्वात मोठे हरीण असलेला सांबर हा प्राणी आहे. दाट रानात वास्तव्य करणारे सांबर बऱ्याच वेळा एकेकटे किंवा लहान कळपाने आढळते. सांबराच्या प्रचंड आकाराप्रमाणेच त्याची भारशिंगेही फार मोठी असतात. पूर्ण वाढ झालेल्या शिंगड्या नराचे वजन २२५ ते ३२० किलोपर्यंत असते. नराची शिंगे चांगलीच मोठी असून, त्यांचा फैलावही बराच मोठा असतो.
              याचा रंग गडद पिवळसर- तपकिरी असतो. भौगोलिक बदलांप्रमाणे हा रंग गडद किंवा फिकट होतो. खूप जास्त वयाचा नर प्रचंड आकारचा व जवळपास कळ्याच रंगाचा असतो. याच्या खाद्यात प्रामुख्याने गवत, काही झाडांची पाने व अनेक वन्य फळांचा समावेश असतो. सांबरे ही रात्रभर चरतात. रात्री भरपूर चरून ती दिवस उगवण्याच्या सुमारास दाट जंगलात निघून जातात व पुन्हा संध्याकाळ झाल्याशिवाय बाहेर पडत नाही.
             त्यांना घनदाट जंगले आवश्यक असल्याने अशाच भागात ती दिसून येतात. डोंगराळ भागातील शेताजवळचे जंगल हे सांबराचे आवडते वसतिस्थान आहे. सांबर अतिशय संवेदनशील हरीण आहे. त्याची घ्राणेंद्रियें अतिशय सक्षम असतात. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून ऐकण्याची शक्ती चांगली असते. संबरांना पाण्यात उतरून पोहायला आवडते. ती पाणलिलीची पाने खाण्याकरिता पाण्यात उतरतात तेव्हा त्यांचे डोके व शिंगेच फक्त पाण्यावर दिसून येतात.
            बहुतेक सांबरांची शिंगे उन्हाळ्याच्या सुमारास गळतात व पावसाळ्याच्या सुरुवातीला नवीन येतात. पावसाळ्यात त्यांच्या शिंगांवरची मखमल बघता येते. सांबरांची वीण पावसाळ्याच्या सुमारास होते. पिले जन्मतःच फार चपळ असतात व नेहमी आईसोबतच राहतात.

=================================================

मुंगूस
मराठी नाव :मुंगूस
इंग्रजी नाव :Common Mongoose
शास्त्रीय नाव : Herpestes edwardsil
हिंदी नाव :नेवला

माहिती: सर्वसाधारणपणे घराशेजारी, शेताजवळ, बागेत दिसणारा सामान्य मुंगूस हा चपळ व देखणा प्राणी आहे. मुंगूस हा काही घनदाट अरण्यात राहणारा प्राणी नाही. याचा जास्त आढळ उघड्या माळरानात, झुडपी जंगलात, शेतामध्ये असतो. अशा ठिकाणी हा सहजपणे वावरतो. एखाद्या दगडाखालच्या बिळात याचे नेहमीच वास्तव्य असते. काही वेळेस हा झाडाच्या बुडाशी स्वतः खोदलेल्या खड्डयातही वास्तव्य करतो. सामान्य मुंगसाची लांबी जवळपास ३ फूटांची असते. त्यापैकी दीड फूट नुसते त्याचे शेपूटच असते. साधाराणपणे त्याचे वजन दीड किलोपर्यंत असते. नर नेहमीच मादीपेक्षा मोठा असतो. घरातल्या उंदीर, घुशींचा नाश करण्याच्या कामगिरीमुळे मुंगूस शेतकऱ्यांचा मित्र ठरते.
      मुंगूसचा रंग पिवळसर-करडा असतो. त्याच्या अंगावर कुठेही ठिपके किंवा पट्टे नसतात. भारतात या मुंगूसाच्या ३ उपजातींची नोंद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिवासात स्वतःला सामावून घेण्याची  सामान्य  मुंगसाची क्षमता अद्वितीय आहे.
           मुंगूसाच्या खाद्यात उंदीर, घुशी, साप, सरडे, बेडूक, मोठे कीटक, विंचू, गोम यांचा समावेश असतो. ते पक्ष्यांची अंडी, पिल्ले, फळे हेही तेवढ्याच चवीने खाते. मुंगूस बऱ्याच वेळेस मेलेल्या जनावरांचे मांसही खातात. मुंगूस एकेकट्याने किंवा जोडीने शिकार करतात. मुंगूसाला सापाबरोबर लढतानाही काही वेळेस पाहिले गेले आहे. मात्र, मुंगूस व सापामध्ये पारंपरिक शत्रुत्व असते की भक्ष्य-भक्षक स्पर्धा, हे कळणे मनोरंजक ठरेल.
            मुंगूसाची वीण वर्षभर होते. एका विणीमध्ये मादी ३ पिल्लांना जन्म देते.

संकलन:-मंजिरी होनकळसे

टंकन:-अभिलाषा शिंपी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग